पोलिसांनी रोखला मोर्चा : पीएम निवासस्थानाच्या दिशेने जात होते केजरीवाल
दिल्लीच्या रस्त्यांवर मंगळवारी ई20 वरून मोठा गोंधळ दिसून आला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ई20 पेट्रोलला विरोध दर्शवत पंतप्रधान निवासस्थानाच्या मोर्चा सुरू केला. तर या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी फिरोज शाह मार्गावरच रोखले. यानंतर केजरीवाल यांनी स्वत:च्या शेकडो समर्थकांसह रस्त्यांवरच धरणे आंदोलन सुरू करत पंतप्रधानांच्या भेटीची मागणी सुरू केली. यादरम्यान त्यांनी ई20 मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले.
केजरीवाल हे प्रथम आप मुख्यालयात पोहोचले, जेथे पूर्वीपासून दाखल झालेल्या शेकडो समर्थकांसह ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले. यादरम्यान त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह देखील होते. या मोर्चाला पोलिसांनी मध्येच रोखल्याने त्यांनी रस्त्यांवरच समर्थकांसोबत धरणे आंदोलन सुरू केले. यादरम्यान केजरीवाल आणि पोलिसांदरम्यान वादावादी देखील झाली.
या मोर्चासाठी केजरीवालांनी प्रशासनाकडून अनुमती घेतली नव्हती असे पोलिसांचे सांगणे होते. बीएनएस एस 163 लागू असल्याने पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत कुठलाही मोर्चा जाऊ दिला जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ई20 पेट्रोलमुळे कोट्यावधी लोक त्रस्त आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकार जबरदस्तीने ई20 पेट्रोल जनतेवर लादत आहे. सरकार अमेरिकेच्या इथेनॉलचा वापर करत आहे, हा प्रकार योग्य नाही. ट्रम्प यांच्या दबावाखाली येत इथेनॉल खरेदी करणे सरकारने थांबवावे असे वक्तव्य केजरीवालांनी यावेळी केले आहे. ई20 मुळे लोकांच्या वाहनांचे मायलेज कमी होत असून वाहनांमध्ये बिघाड होतोय. सरकाने कुठल्याही तर्क न देता हे इंधन जनतेवर लादत असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
आम्ही आमच्यासोबत 2.30 लाखाहून अधिक अर्ज घेऊन आलो आहोत. हे अर्ज म्हणजेच जनतेचा आवाज आहे, आम्ही पंतप्रधानांना भेटून हे अर्ज त्यांना सोपवू इच्छितो, जेणेकरून त्यांनी सामान्य लोकांचे म्हणणे जाणून घेत इथेनॉल ब्लेंडेड फ्यूल धोरण मागे घ्यावे असा दावा केजरीवालांनी यावेळी केला.
अर्ज सोपविले, उत्तराची प्रतीक्षा
काही वेळानंतर पोलिसांच्या आग्रहानंतर केजरीवालांनी स्वत:सोबत आलेले अर्ज अधिकाऱ्यांकडे सोपवून धरणे आंदोलन थांबविले. ई20 विरोधात 2 लाख 33 हजारांहून अधिक लोकांची स्वाक्षरी असलेल्या अर्जाची प्रत केजरीवालांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविण्यात आली आहे, आता देशाला पंतप्रधानांच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
Comments are closed.