माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे

परंतु निर्णय पक्षनेतृत्व घेणार: उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे वक्तव्य

लखनौ : उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेवरून राजकीय वर्तुळात कयास वर्तविले जात असतात. परंतु मौर्य यांनी पहिल्यांदाच एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा मनात असल्याचे मान्य केले आहे. मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा असली तरीही पक्षाचे नेतृत्व आणि विधिमंडळातील पक्षाचा गट निर्णय घेत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. आमचे पहिले लक्ष्य बहुमत मिळविणे आहे. याच लक्ष्यासोबत आम्ही निवडणूक लढविणार आहोत. बहुमतानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय विधिमंडळ गट घेणार आहे. केंद्रीय निरीक्षक आमदारांचे मत जाणून घेत मुख्यमंत्री पदी कोण बसणार याचा निर्णय जाहीर करतात, असे मौर्य यांनी म्हटले आहे. 2027 च्या निवडणुकीनंतर उत्तरप्रदेशात भाजप चेहरा बदलणार का, असा प्रश्न मौर्य यांनी विचारण्यात आला. यावर पुढील वेळी मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड करावी याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल, केशव प्रसाद घेणार नाही, असे उत्तर मौर्य यांनी दिले आहे. आगामी विधानसभा निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच लढविली जाणार असल्याचे भाजप अध्यक्ष नितिन नवीन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

 

Comments are closed.