राहुल गांधी यांनी आज राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलण्यासाठी
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये येत्या आठवड्यात लोकसभेत दोन प्रमुख चर्चा होणार आहेत. राष्ट्रपतींनी संयुक्त सभागृहात केलेले अभिभाषण आणि त्यानंतर मांडलेला अर्थसंकल्प या दोन्ही मुद्यांवरून चालू आठवडा गाजणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी आर्थिक आणि राजकीय विचारांसह केंद्र सरकारवर जोरदार टीका करू शकतात. राहुल गांधी सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेला सुरुवात करतील. यानंतर ते केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेचेही नेतृत्व करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतील, असे संसदीय कामकाज समितीकडून रविवारी सायंकाळी सांगण्यात आले.
1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेचच विविध तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सत्ताधारी एनडीएने अर्थसंकल्पाचे वर्णन कल्याणकारी आणि नवी दिशा देणारा असे केले, तर विरोधकांनी याला निवडणूक अर्थसंकल्प असल्याचे संबोधत त्यात दूरदृष्टीचा अभाव असल्याचे म्हटले आहे.
अभिभाषण आणि अर्थसंकल्पावरील चर्चेसोबतच राहुल गांधी इतर मुद्देही सभागृहात उपस्थित करू शकतात. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यादरम्यान कथित व्हीआयपी संस्कृती आणि अलिकडच्या चेंगराचेंगरीत अनेक यात्रेकरूंच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित करतील. त्याव्यतिरिक्त जातीय जनगणनेची मागणी पुन्हा एकदा मांडू शकतात. सरकार यावर्षी दशकीय जनगणना करण्याची योजना आखत आहे, परंतु अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नव्हता.
Comments are closed.