पश्चिम बंगालमध्ये राजकीय तापमान वाढले आहे
पश्चिम बंगालमध्ये राजकीय तापमान वाढले
पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या कलांमधून सत्तांतराची शक्यता व्यक्त केली जात असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे.
मतमोजणीदरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाजप सुमारे 193 जागांवर आघाडीवर आहे, तर तृणमूल काँग्रेस (TMC) सुमारे 94 जागांवर पुढे असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
भवानीपूर मतदारसंघातील उमेदवार म्हणून बोलताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतमोजणी प्रतिनिधींना केंद्र सोडून न जाण्याचे आवाहन केले. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये जाणूनबुजून आघाडी दाखवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी काही ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आल्याचेही म्हटले. तसेच काही यंत्रांमधील आकडेवारी जुळत नसल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय, केंद्रीय यंत्रणा आणि निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तरीही त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी असल्याने अंतिम निकाल वेगळा लागू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. “निराश होऊ नका, शेवटी विजय आपलाच होईल,” असा संदेश त्यांनी दिला.
Comments are closed.