पराभवाच्या भीतीनेच भाजपकडून फुटीचे राजकारण, हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी लावालावी सुरू आहे; आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मतचोरी करून, सेटिंग लावून, स्वतःची माणसे निवडणूक आयोगात बसवून आणि दहा-दहा हजार रुपये वाटूनही मुंबईत जिंकता येणार नाही या भीतीपोटीच भारतीय जनता पक्षाकडून फुटीचे राजकारण केले जात आहे, हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी यांच्यात लावालावी सुरू आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज चढवला.

आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या फुटीच्या राजकारणावर टीका केली. पारदर्शकपणे, निःपक्षपातीपणे निवडणुका झाल्या तर भाजपला एकही जागा मिळणार नाही म्हणूनच त्यांच्याकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप नेहमीच हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याचा प्रयत्न करते आणि ते चालत नाही तिथे हिंदूंमध्येच लावालावी करते. जातीपातीचे राजकारण जिथे चालत नाही तिथे मराठी-अमराठी असे राजकारण भाजपकडून केले जाते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रारूप मतदार यादीत लाखो दुबार मतदार

प्रारूप मतदार यादीत लाखो नावे संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंदवण्यात आली आहेत. एकेका घरात दहापेक्षा जास्त मतदार दाखवले गेले आहेत. अनेक दुकानांमध्ये मतदार दाखवले गेले आहेत. इतकेच नव्हे तर सुलभ शौचालयांच्या पत्त्यावरही मतदार नोंदवले गेले आहेत, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.

पालघर साधू हत्याकांडातील आरोपीच्या पक्षप्रवेशाला भाजपने स्थगिती का दिली?

पालघरमधील साधूंच्या हत्याकांडावरून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत होता. मग आता त्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी काशीनाथ चौधरी याला भाजपने पक्षात घेऊन नंतर त्याच्या पक्षप्रवेशाला स्थगिती का दिली, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

बिहारमधील व्होटचोरी लवकरच उघड होईल

विरोधी पक्षांकडून भाजपची व्होटचोरी सातत्याने उघड केली जात आहे. हरयाणा आणि वरळी मतदारसंघातील व्होटचोरी आम्ही उघड केली तशीच बिहारमधील व्होटचोरीही लवकरच उघड होईल. आतापर्यंत निवडणुकीनंतर ते उघड करत होतो. मात्र आता निवडणुकीपूर्वीच प्रारूप मतदार यादीतील व्होटचोरी आम्ही उघड केली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

व्होटचोरीविरुद्ध शिवसेनेची लढाई सुरूच राहणार

व्होटचोरीचे प्रकरण शिवसेना लावून धरेल असा इशारा देतानाच, दुबार, तिबार आणि बोगस मतदार शोधण्याचे काम सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी, मतदारांच्या हक्काच्या रक्षणासाठी शिवसेनेची लढाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments are closed.