मुंबईने निवडून दिलेल्या खासदाराने मुंबईचा विश्वासघात केला; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

भाजपकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील अनेक महत्त्वाची कार्यालये भाजपने दिल्लीत नेली आहेत. तसेच महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत. मुंबईतील प्रसिद्ध हिरे उद्योगही गुजरातमध्ये नेण्यात आला आहे. मुंबईची लूट आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा कुटील डाव या मुद्दयांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सीजीपीडीटीएमचे मुख्यालय दिल्लीला नेण्यात येणार आहे. याबाबतचे पत्रही आदित्य ठाकरे यांनी पोस्टसोबत जोडले आहे. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये दिल्लीला नेण्याचा घाट भाजपकडून घालण्यात येत आहे. यातून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव दिसत आहे. हे कार्यालय दिल्लीला नेण्यात येत असल्याने आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्याने किती लज्जास्पद कृत्य केले आहे. ज्या माणसाने त्याला निवडून दिले त्या मुंबईचा त्यांनी विश्वासघात केला आहे. भाजपच्या प्रत्येक कृतीतून मुंबईचा अपमान करण्यात येत आहे. तसेय आपल्या जखमांवर भाजपकडून मीठ चोळण्यात येत आहे. त्या मंत्र्याला वाटते की राज्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या योगदानासाठी केंद्राकडून आपला योग्य वाटा मागू नये. हे मुख्यालय हलवण्याची काय गरज आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Comments are closed.