मिंधे टोळीच्या मंत्र्यांचा मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार, याला म्हणतात चोर मचाये शोर! आदित्य ठाकरे यांचा टोला; आज परत कोणीतरी गावी जाणार

मिंधे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला आहे. त्यावरून आज परत कोणीतरी गावी जाणार, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर! पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रीमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार?! महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

Comments are closed.