Aaditya Thackeray criticizes BJP on Hindi language issue, calling it Marathi hater


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने राज्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचे शिक्षण पहिलीपासून सक्तीचे केले आहे. पण मराठी आणि इंग्रजी व्यतिरक्त पहिलीपासूनच्या मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नको, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केले आहे. त्यामुळे त्या त्या राज्याच्या सरकारने विचार करून आपल्या राज्यात तीन कोणत्या भाषेचे शिक्षण लागू करायचे आहे, तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने राज्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचे शिक्षण पहिलीपासून सक्तीचे केले आहे. पण मराठी आणि इंग्रजी व्यतिरक्त पहिलीपासूनच्या मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नको, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनसेनंतर आता सर्वच राजकीय पक्ष याविरोधात आवाज उठवू लागले आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी द्वेषी भाजपा असे म्हणत सरकारला सवाल विचारले आहेत. (Aaditya Thackeray criticizes BJP on Hindi language issue, calling it Marathi hater)

ठाकरे गटाचे युवाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भाजपा आणि सोबतच मुंबईकरांनाही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच! त्याविरुद्ध आंदोलन सुरू असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपल्या लक्षात येतंय का? की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचे काय चाललंय?” तसेच, “गिरगाव चौपाटी येथे उद्धव ठाकरेंनी मुंबईत सुरू केलेले ‘मराठी रंगभूमी दालन’ गुपचूप रद्द करायचे, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालये घुसवून त्याचे महत्व कमी करायचे आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करून घोंगडे भिजवत ठेवायचे!” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा… Tejasvee Ghosalkar : याकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे, मुंबै बँक संचालक तेजस्वी घोसाळकरांची स्पष्ट भूमिका

त्याशिवाय, “भाजपा हे सगळं कशासाठी करत आहे?” असा सवालही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. “गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजपा आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? ह्याचे उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा देणार का? आणि ह्यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का?” असे सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी आपल्या मनातील शंका उपस्थित केल्या आहेत. पण या पोस्टमध्ये त्यांनी गिरगाव येथील मराठी भाषेला विरोध झाल्याचा वादाला उजाळा देत भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यामुळे आता “मराठी द्वेषी भाजपा” या आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपा नेतेमंडळी काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Comments are closed.