मिंधे नाकर्ते! आदित्य ठाकरे यांचा भीमटोला

विधानसभेत स्वतःला उत्तरे द्यावी लागू नयेत म्हणून किंवा लोकप्रतिनिधींचा जाणूनबुजून अपमान करायचा म्हणून स्वतःकडील खात्यांच्या उत्तरांची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाईघाईने इतर मंत्र्यांवर सोपवली. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.
मिंधे नाकर्ते आहेतच, आज त्यावर शिक्कामोर्तब झाले, असा भीमटोला त्यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे.
‘‘देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना किंवा आता मुख्यमंत्री असतानाही स्वतः प्रश्नोत्तरांना उभे राहतात. अजितदादाही स्वतः प्रश्नांची उत्तरे देतात, पण काहींकडे मात्र उत्तरेच नसल्याने किंवा लोकप्रतिनिधींना तोंड देण्याची क्षमताच नसल्याने स्वतःवरची जबाबदारी झटकण्याची वेळ आली आहे,’’ असे त्यात नमूद केले आहे.
विधिमंडळाचा, लोकप्रतिनिधींचा अपमान करणाऱया अशा अकार्यक्षम व्यक्तीसोबत बाकांवर बसणं कसं सहन होतं? असा सवालही या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांना केला आहे.
बलात्कार शांततेत पार पडला, अशा प्रकारचे भयंकर उद्गार काढणाऱया मंत्र्यांना ज्या राज्यात पदावरून काढून न टाकता अभय दिले जाते त्या मंत्रिमंडळाकडून जनता काय अपेक्षा ठेवणार? असा उद्विग्न सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. सक्षम मंत्रिमंडळ असते तर तातडीने अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली असती, असेही ते म्हणाले.
Comments are closed.