Abu Azmi criticizes Raj Thackeray, demanding that Hindi be made the national language of the country


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा कशी शिकवता हे पाहू, असा इशारा दिला आहे. याचपार्श्भूमीवर समाजवाजी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना हिंदीला देशाची राष्ट्रभाषा बनवण्याची मागणी देखील केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, त्रिभाषा सूत्राची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्राला विरोधकांकडून विरोध होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा कशी शिकवता हे पाहू, असा इशारा दिला आहे. याचपार्श्भूमीवर समाजवाजी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना हिंदीला देशाची राष्ट्रभाषा बनवण्याची मागणी देखील केली आहे. (Abu Azmi criticizes Raj Thackeray, demanding that Hindi be made the national language of the country)

राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून वाद सुरू असताना अबू आझमी म्हणाले की, राज्य सरकारने तीन भाषा शिकणं अनिवार्य करण्याची अधिसूचना काढली आहे. महाराष्ट्रात पहिली भाषा मराठी आणि दुसरी इंग्रजी आहे. परंतु आपले सगळे लोक इंग्रजीचे गुलाम झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात आता तिसरी कुठली भाषा शिकवणार? गुजराती शिकवणार का? असा प्रश्न उपस्थित करत अबू आझमी म्हणाले की, आपल्याकडे तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय आहे. मी 50 वेळा सांगितलं आहे की, केंद्र सरकारची संसदीय समिती, हिंदी भाषेला प्रोत्साहन देते आणि देशभर हिंदी पसरवण्याचं काम करते. केंद्र सरकारची सगळी कामं हिंदी भाषेत होतात. असे असताना काही लोक केवळ राजकारण करत असून जनतेला मुर्ख बनवण्याचं काम करत आहेत, असे म्हणत अबू आझमी यांनी नाव न घेता मनसे पक्षावर निशाणा साधला.

हेही वाचा – Politics : सरकारी पदावर असताना मी कधीही…; अजितदादा विजयी होताच शरद पवारांनी लगावला टोला

अबू आझमी म्हणाले की, महाराष्ट्रात पहिली मराठी भाषा आहे आणि मराठीला कोणी विरोध केलेला नाही. मात्र हिंदी संपूर्ण देशात अनिवार्य आहे. केंद्र सरकारची सगळी कामं हिंदीत व्हावी, यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. ही समिती देशात हिंदीला पुढे नेण्याचं काम करत आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की, हिंदीला देशाची राष्ट्रभाषा बनवली पाहिजे. केंद्र सरकारने तशी घोषणा केली पाहिजे. तसेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे लोक बोलू शकतील अशी एक भाषा असावी. मी उद्या आसामाला गेलो तर, मला तिथली आसामी भाषा बोलता येत नाही. मग मी काय आसामी भाषा शिकत बसू का? असा प्रश्न उपस्थित करत अबू आझमी म्हणाले की, देशात एक भाषा असली पाहिजे. जी संपूर्ण देशभर चालेल. पण तरीही ज्यांना विरोध करायचा आहे, त्यांनी विरोध करत बसावं, असे म्हणत अबू आझमी यांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधला.

त्रिभाषा सूत्रावर सरकारचे एक पाऊल मागे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी (23 जून) रात्री उशिरा एक बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मत व्यक्त केले. यावरून त्यांनी त्रिभाषा सूत्रावर एक पाऊल मागे घेत असल्याचे चित्र दिसत आहे. सदर बैठक ही इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राला आणि सर्वसाधारण हिंदी भाषा शिकवण्यास होणारा विरोध बघूनच घेण्यात आली होती. त्यामुळे आता राज्य सरकार या विषयावर काय पाऊल उचलते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Shaktipeeth Mahamarg : दोन मंत्र्यांचा विरोध! राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना दगड तयार ठेवण्यास सांगितले



Source link

Comments are closed.