एअर इंडियाच्या उड्डाण समस्या सुरू आहेत

अहमदाबाद-लंडन, दिल्ली-पॅरीस उड्डाणे केली रद्द

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एअर इंडियाच्या विमानांचे तांत्रिक समस्यासत्र अद्यापही असून दोन विमानो•ाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदाबाद-दिल्ली आणि दिल्ली-पॅरीस अशी ही विमाने आहेत. लंडनला जाणारे विमान दिल्लीहून अहमदाबाद येथे आले होते. त्यानंतर ते लंडनला जाणार होते. तथापि, काही तांत्रिक समस्या उद्भवल्याने ही फेरी रद्द करण्यात आली. विमान दुर्घटनेनंतरची रद्द करण्यात आलेली ही दुसरी अहमदाबाद-लंडन विमानफेरी आहे. विमानची तपासणी केली जात आहे.

दिल्लीहून पॅरीसला जाणारे याच कंपनीचे विमानही मंगळवारी रद्द करण्यात आले आहे. सोमवारी दिल्लीहून रांचीला जाणारे विमान दिल्लीहून सुटल्यानंतर पुन्हा दिल्लीला परतविण्यात आले होते. तसेच मंगळवारी सकाळी मुंबईहून सानफ्रान्सिस्कोला जाणारे विमान कोलकाता विमानतळावर उतरविण्यात आले आहे. या विमानातील सर्व प्रवाशांना विमान सोडण्याची सूचना करण्यात आली आहे.

दिल्ली-हाँगकाँग प्रवास सुखरुप

तांत्रिक समस्यांनी घेरलेल्या एअर इंडिया कंपनीसाठी एक दिलासादायक वृत्तही मंगळवारी मिळाले आहे. या कंपनीचे एक विमान हाँगकाँग विमानतळावर सुखरुप पोहचले आहे. मात्र, कोणतीही चूक होऊ नये यासाठी या विमानाचीही तपासणी करण्यात येत आहे. कंपनी आता कोणताही धोका पत्करण्यास तयार नसून तांत्रिक समस्येचा संशय निर्माण झाला, तर अशा विमानाची तपासणी केली जात आहे.

बाँब धमकीमुळे विमान वळविले

कोचीहून दिल्लीला निघालेले इंडिगो कंपनीचे प्रवासी विमान, त्यात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्यामुळे मंगळवारी नागपूर येथे वळविण्यात आले आहे. धमकी देणाऱ्याने सविस्तर माहिती सांगून धमकी दिल्याने ही धमकी विश्वसनीय मानली गेली आहे. त्यामुळे विमान तातडीने नागपूरच्या विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. तथापि, त्यात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. सोमवारीही लुफ्तान्सा कंपनीचे एक विमान, जे हैद्राबाद विमानतळावर उतरणार होते, ते बाँबच्या धमकीमुळे पुन्हा फ्रँकफर्टला नेण्यात आले होते. अशा प्रकारे तांत्रिक समस्या आणि बाँबच्या धमक्या यामुळे विमानसेवांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

135 मृतांची पटली ओळख

दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलेल्या अहमदाबाद-लंडन विमानातील 135 मृत प्रवाशांची ओळख डीएनए परीक्षणाच्या माध्यमातून पटली आहे. आतापर्यंत 101 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले आहेत, अशी माहिती गुजरात सरकारने दिली आहे. या दुर्घटनेत विमानातील आणि भूमीवरील मिळून 279 जणांचा बळी गेला होता. विमानातील अनेक मृतदेहांचा आगीमुळे अक्षरश: कोळसा झाला आहे. त्यामुळे डीएनए परीक्षणाच्या माध्यमातूनही त्यांची ओळख पटविणे अशक्य झाले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

चौकशी गतीमान

अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी वेगवान पद्धतीने करण्यात येत आहे. घटनास्थळी जाऊन गुन्हाविज्ञान शाखेच्या पथकाने पुरावे संकलित केले आहेत. विमातनळ अधिकारी आणि इतर संबंधितांची चौकशी केली जात आहे. विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्सेस हाती लागले असून त्यांच्यात धनिमुद्रित झालेली माहिती डीकोड करुन जाणून घेण्यात येत आहे. या माहितीचे पूर्ण विश्लेषण करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील. या विश्लेषणातूच दुर्घटनेचे नेमके कारण समजून येणार आहे.

Comments are closed.