अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; अक्षय आणि ट्विंकल थोडक्यात बचावले.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या ताफ्यातील एका गाडीला सोमवारी रात्री मुंबईतील जुहू परिसरात भीषण अपघात झाला. एका भरधाव मर्सिडीज कारने रिक्षाला धडक दिली, ज्यामुळे ती रिक्षा अक्षय कुमारच्या ताफ्यातील ‘इनोव्हा’ गाडीवर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना दुसऱ्या कारमध्ये पुढे असल्याने ते या अपघातातून सुरक्षित बचावले आहेत.
#पाहा | मुंबई | अपघातात जखमी झालेल्या ऑटो-रिक्षा चालकाचा भाऊ मोहम्मद समीर सांगतो, “ही घटना रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास घडली. माझा भाऊ रिक्षा चालवत होता तेव्हा अक्षय कुमारची इनोव्हा आणि एक मर्सिडीज मागे होती. तेव्हा मर्सिडीजने धडक दिली… https://t.co/u1jS3IArC7 pic.twitter.com/WWub77zYX6
— ANI (@ANI) 19 जानेवारी 2026
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. एक मर्सिडीज कार वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रिक्षावर आदळली. या धडकेच्या तीव्रतेमुळे रिक्षा अक्षयच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला जाऊन धडकली. या अपघातात रिक्षाचालक आणि त्यातील प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. अद्याप याप्रकरणी अधिकृत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे अधिक तपास करत आहेत. अक्षय कुमारच्या टीमकडून अद्याप या घटनेबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. या अपघातामुळे जुहू परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments are closed.