दिल्लीत शस्त्रसाठा जप्त

चार तस्करांना अटक : पाकिस्तानचा मोठा कट उधळला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील लाल किल्ल्यावरील बॉम्बस्फोटानंतर अवघ्या 10 दिवसांत जैश-ए-मोहम्मदने रचलेला आणखीन एका हल्ल्याचा गंभीर कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तान, चीन आणि तुर्कीशी संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण नेटवर्कच्या कारवायात पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआयचा थेट सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दिल्लीमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत चार तस्करांना अटक करत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली. आतापर्यंत, या प्रकरणात टोळीच्या चार प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची ओळख पटली असून मनदीप, दलविंदर, रोहन आणि अजय अशी त्यांची नावे आहेत. केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 10 हाय-टेक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल आणि 92 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही पिस्तूल तुर्की-निर्मित पीएक्स-5.7 आणि चिनी-निर्मित पीएक्स-3 प्रकारची आहे. अशा प्रकारची पिस्तूल सामान्यत: विशेष दल आणि सुरक्षा एजन्सी वापरतात.

आयएसआय कनेक्शन

तपास यंत्रणांनी शस्त्रास्त्र तस्करीतील मोठे रॅकेट पकडल्यानंतर आता पुढील तपास सुरू केला आहे. ही शस्त्रs सुरुवातीला तुर्की आणि चीनमधून पाकिस्तानला पाठवली जात होती. नंतर आयएसआयच्या मदतीने ती भारतात तस्करी केली जात होती. ही शस्त्रs पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोनद्वारे आणली जात होती आणि तेथून ती दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना पोहोचवली जात होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक केलेले आरोपी फक्त शस्त्रास्त्रांची डिलिव्हरी आणि वाहतूक करत होते, तर संपूर्ण योजना आणि नेटवर्क आयएसआयच्या इशाऱ्यावर चालवले जात होते, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

तपास यंत्रणांची कारवाई

क्राइम ब्रांच आता या टोळीने भारतात आतापर्यंत किती शस्त्रास्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्या किंवा गुन्हेगारांपर्यंत ती पोहोचवली याचा तपास करत आहे. या तपासासाठी पोलीस मोबाईल फोन डेटा, बँक व्यवहार, सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी आणि इतर डिजिटल फॉरेन्सिक साधनांचा आधार घेत आहेत. प्राथमिक तपासात अनेक स्थानिक गुन्हेगार आणि टोळ्या शस्त्रास्त्र पुरवठ्यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे.

दिल्ली पोलिसांचा मोठा दावा

या कारवाईमुळे आयएसआय समर्थित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. भविष्यात, तपास संस्था संपूर्ण नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची योजना आखत आहेत आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या टोळीचे नेटवर्क पूर्णपणे संघटित असून त्यांचे ध्येय भारतात रक्तपात आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे हेच असल्याचेही सांगण्यात आले

Comments are closed.