क्रिकेटवारी – विजय बॅझबॉलचा…!

>> संजय खडे

चार दिवस सासूचे अन्… आपली प्रसिद्ध मराठी म्हण तुम्हीच पूर्ण करा आणि पहिल्या कसोटीतली सासू कोण आणि सून कोण हेही तुम्हीच ठरवा!

सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लिश आघाडीवीर क्रॉली आणि शतकवीर डकेट यांनी हिंदुस्थानी गोलंदाजांची अशी काही पिटाई केली की, पहिले चार दिवस आपण साजरी केलेली दिवाळी शमली अन् तोंडी आली होळी!

चौथ्या डावात शेवटच्या दिवशी 371 धावांचं लक्ष्य हासिल करण्यासाठी बायकोच्या अरेला कारे करण्याचा बाणा लागतो! क्रॉली आणि डकेट यांनी हाच बाणा दाखवत 188 धावांची सलामी देऊन विजयाचा गोफ विणला. बॅझबॉलचं ते अप्रतिम प्रदर्शन होतं. डकेटच्या कारकिर्दीतलं हे सर्वात महत्त्वाचं शतक ठरावं. केवळ 170 चेंडूत 149 धावांची बरसात त्याने केली! त्यानंतर रूट, स्टोक्स आणि स्मिथने उर्वरित कार्य उरकले. पहिल्याच कसोटीत हिंदुस्थानचा पराभव झाला.

आता दुसऱया एजबॅस्टन कसोटीसाठी दोन-तीन बदल होतील. दमछाक झालेला बुमरा विश्रांती घेईल. प्रसिधने केलेली गोलंदाजी त्याला अप्रसिद्ध करून गेली आहे. त्याच्या जागी अर्शदीप संघात येऊ शकतो. चार दिवस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून वर्गाबाहेर उभा राहिलेला शार्दुल ठाकूर दोन बळी मिळवत ‘आहे बाई नमस्ते’ म्हणत वर्गात आला, पण तो तेवढाच. बाकी तो ऱहस्व-दीर्घच्या चुका करतच राहिला. कुलदीपचाही संघात समावेश व्हायला हवा. हिंदुस्थानचा संघ का हरला? उत्तरं सोपी आहेत. दोन्ही डावांत शतकवीर सोडले तर पडझड झाली, इच्छित धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या डावात दिसलेला बुमरा दुसऱया डावात हरपला. आणि क्षेत्ररक्षण? ते काय असतं? यशस्वी जयस्वाल, करुण नायर, शार्दुल ठाकूर यांनी हाच प्रश्न विचारला! ‘अप्रतिम क्षेत्ररक्षकावरही अशी वेळ येऊ शकते’ असं म्हणत संजय मांजरेकरने जयस्वालच्या तीन झेल सोडण्याची भलामण केली. पण क्षेत्ररक्षण करताना ढेंगे अन् झेल सोडणाऱयांकडून ‘काsंबडीपकड’ सराव करवून घ्यावा असं माझं पक्पं मत आहे!

सामना रंजक झाला, पण हिंदुस्थानचा पराभव झाला. असो, सामन्यात कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षा खेळाचा विजय झाला असं सवयीप्रमाणे म्हणत आपण आपली समजूत घालून घेऊ आणि नव्या दमाने 2 जुलै रोजी एजबॅस्टनला होणाऱया दुसऱया कसोटीकडे आशा लावून बसू!

Comments are closed.