सिनेमा – विलक्षण संघर्षाचा प्रवास

>> प्रा? अनिल कवठेकर

2017 साली ज्या काळात सुषमा स्वराज परराष्ट्र खात्याच्या मुख्य पदी होत्या, त्या काळात घडलेली ही सत्य घटना आहे. सुषमा स्वराज यांची भारतीय मुसलमान मुलीबाबत असलेली आत्मीयता आणि पाकिस्तानातल्या भारतीय आम्बेसीमध्ये काम करणाऱ्या जे.पी. सिंग या अधिकाऱ्याने अत्यंत चाणाक्षपणे, धूर्तपणे, सावधपणे आणि चित्रपटाचे नाव सार्थ करणाऱ्या डिप्लोमॅटप्रमाणे आपल्या ओळखीचा, अधिकाराचा त्या मुलीच्या सुटकेसाठी केलेला प्रयत्न व त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केलेली व्यूहरचना विचार करायला  लावणारी आहे. भारतीय आयएएस किंवा आयएफएस खात्यातले अधिकारी यांना किती उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते, हेही लक्षात येते. देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची  भूमिका आणि त्या संघर्षाचा प्रवास ‘डिप्लोमॅट’मध्ये खूप छान चित्रित झालेला आहे.

पाकिस्तानमधील बुणेर प्रांतामधील निर्जन डोंगररांगांमध्ये एक पाकिस्तानी आपल्या मुलाला बंदूक कशी चालवायची ते शिकवत आहे. एवढय़ात एक जीप येते आणि एका बुरखाधारी तरुणीला घेऊन तो निघतो. पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये असणाऱ्या भारताच्या आम्बेसी कार्यालयात त्या तरुणीला घेऊन ती गाडी पोहोचते. पाकिस्तानमधून भारतात पाठवण्याची कागदपत्रे तपासणीची खिडकी उघडायला काही वेळ असतो. तेवढय़ात तिला घेऊन आलेले दोघे तरुण सिगारेट ओढायला जातात आणि कागदपत्रे तपासण्याची खिडकी उघडते. ती तरुणी वेगाने धावत जाऊन त्यांना सांगते, “मी भारतीय नागरिक आहे. मला आत घ्या. मला ऑफिसमध्ये घ्या. मी मोठय़ा समस्येत अडकलेली आहे’’. तो तरुण अधिकारी गोंधळात पडतो. समोरची तरुणी कोण? कुठली? हे काहीच माहीत नाही. तिला भारतीय हद्दीत घ्यायचे म्हणजे मोठी जोखीम. “काही लोकांनी मला बुणेरमध्ये लपवून ठेवलं होतं. प्लीज मला मदत करा.’’ गोंधळात उडालेला तरुण अधिकारी केवळ तिच्या आवाजातून जाणवणारी तिच्या दुःखाची सत्यता, तिच्या डोळ्यांतली भीती या आधारावर एक मोठी रिस्क घेतो. तिला आतमध्ये घेण्यासाठी दरवाजा उघडतो. ती जीव मुठीत घेऊन पळत आत येते. पाकिस्तानसारख्या देशात भारतीय  अॅम्बेसीमध्ये आपल्या देशाची तरुणी येऊन मला पाकिस्तानमध्ये कैद केल्याचे सांगते. आता ही केस कोणत्या पद्धतीने सोडवायची हा ‘डिप्लोमॅट’ या चित्रपटाचा मुख्य प्लॉट आहे आणि तो व्यवहारी पद्धतीने सोडवणे शक्य नसल्यामुळे त्यासाठी जी पद्धत वापरावी लागते ती म्हणजे डिप्लोमॅट होय!

चित्रपट सुरू झाल्यावर 15 मिनिटे ही दृश्ये दाखवली जातात आणि ‘डिप्लोमॅट’च्या कथेत प्रेक्षक  गुंतला जातो. जे घडतेय ते काहीतरी विलक्षण वेगळे असल्याची  जाणीव प्रेक्षकांना करून देण्यात दिग्दर्शक शिवम नायर यशस्वी झालेला आहे.

त्या तरूणीच्या पासपोर्टची तपासणी होते. ताहीर नावाच्या पाकिस्तानी तरुणाने फसवून तिला पाकिस्तानात नेले आहे आणि बळजबरीने तिच्याशी लग्न लावलेले आहे. ज्या भागामध्ये पाकिस्तानी सैनिक जायला घाबरतात, त्या पाकिस्तानमधल्या बुणेर भागात तो तिला घेऊन गेला आहे. अडचण अशी की, ज्या शहराचा व्हिसा तिला मिळालाय ते शहर सोडून तिला दुसऱ्या शहरात जाणे शक्य नाही अशी तिथे व्यवस्था आहे आणि ती मात्र बुणेरमध्ये कशी पोहोचली, हे ती जेव्हा सांगते, तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नाही. पाकिस्तानी उच्च अधिकारी तिला पाकिस्तानातून सोडायला तयार नाहीत. कारण त्यांना ती भारतीय हेर असावी आणि आपण फसवले गेलो आहोत असे कारण सांगून तिला पाकिस्तानातून बाहेर पडायचे आहे असे वाटते. एका फसवलेल्या भारतीय मुसलमान स्त्रीला स्वतच्या सुटकेसाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्या संघर्षात दोन देशांची भूमिका पाहण्यासाठी ‘डिप्लोमॅट’ पाहायला हवा.

जॉन अब्राहम याने जेपी सिंग या आयएफएस भारतीय अधिकाऱ्याची भूमिका चोख बजावलेली आहे. तो पाकिस्तानी वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगतो की, तिच्याकडे एक माणूस म्हणून पहा. तिच्यावर होणारा अन्याय, तिला कसे फसवलेय, तिला कशी मारहाण केली जातेय हे लक्षात घ्या. पाकिस्तानी अधिकारी जेपीशी बोलताना तिला आपण पाठवू या असे सांगतो. नंतर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलताना तिला पाठवता येणार नाही असे सांगतो. हाच खरा डिप्लोमॅटचा अर्थ आहे. या चित्रपटात संवाद फार कमी आहेत, पण जे संवाद आहेत त्या संवादांतून अनेक वेळा डिप्लोमॅट या शब्दाचा अर्थ प्रतीत होत जातो.

प्रत्येक दृश्यातून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील उच्चपदस्थ व्यक्ती एकमेकांशी बोलताना किती सांभाळून बोलतात. त्यांच्या मीटिंग ज्या घरात होतात, त्या घराचा भव्यपणा व त्या घरातील वस्तूंची रचना आणि या सर्वावरून अतिशय तपशिलात फिरणारा कॅमेरा आपल्या मनाची पकड घेऊ लागतो. पाकिस्तानी उच्च पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप होत असताना जेपी त्यांना विनंती करतो या गोष्टीची बातमी व्हायला नको. पाकिस्तानी अधिकारी मान्य करतात, पण जाणीवपूर्वक याची बातमी केली जाते. यालाच डिप्लोमॅटिक वागणे असे म्हणतात.

एका पतीला भारतीय अॅम्बेसी त्याच्या पत्नीला भेटू देत नाही. तिला त्यांनी कोंडून ठेवले आहे आणि तिच्या खोटय़ा बातम्या पसरवल्या जात आहेत. तिला कोणत्या प्रकारची मारहाण केलेली नाही. तिने आपणहून माझ्याशी लग्न केलेले आहे, असे ताहीर मीडियासमोर सांगतो. या बातमीमुळे होणारी देशाची बदनामी थांबण्याची सूचना परराष्ट्र खात्याकडून आल्यावर तुला भारतात परत यायचे असेल तर मीडियासमोर यावे लागेल आणि ती तरूणी उज्माने मीडियासमोर येऊन सांगावे की, मी इथे स्वतःच्या मर्जीने आली आहे. पण उज्मा इतकी घाबरलेली आहे की, ती त्या अॅम्बेसीमधून बाहेर पडायला तयार नाही. तो ताहीर तिला जिवंत ठेवणार नाही याची तिला भीती आहे. तो तिला घेऊन गेला तर त्या मरणयातना तिला पुन्हा भोगायच्या नाहीत म्हणून ती या गोष्टीला तयार होत नाही. तेव्हा ती जेपीला तिची पूर्ण कथा सांगते.

ती मलेशियात काम शोधायला गेली असता तिथे टॅक्सीत तिची पर्स हरवली. ती पर्स आणून देणारा ताहीर होता. ती एक विवाहित स्त्री होती. तिला एक मुलगी होती. ती ताहीरला  चांगला मित्र समजत होती. उज्माच्या मुलीला दम्याचा आजार असतो. ताहीर तिला त्याच्या देशातला घरगुती उपाय  करायला सांगतो. त्यासाठी तिला पाकिस्तानात बोलावतो. ती ताहीरला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाते.

मलेशियात भेटलेला दाढी मिशा नसणारा कोवळ्या चेहऱ्याचा ताहीर आणि पाकिस्तानमध्ये दाढीमिश्या वाढलेला क्रूर चेहऱ्याचा ताहीर, यातून त्याच्या स्वभावाचे दोन पैलू स्पष्टपणे दिसतात. प्रवासात त्रास होऊ नये म्हणून ताहीर उज्माला झोपेची गोळी देतो. त्या नशेत ती त्या गावात उतरते. त्याच्या घरात प्रवेश केल्याबरोबर तिला बुरख्यात झाकून ठेवण्यात येते आणि तिला कळते की, त्याचे लग्न झालेले आहे. त्याला मोठी मुले आहेत. कापडी पट्टीने तिचे तोंड बांधून तो तिच्यावर बलात्कार करतो.

त्याच घरात ताहीरच्या अनेक बायका आहेत. त्यापैकी एक तिला मदत करते. तिचा मलेशियातल्या माणसाबरोबर कॉन्टॅक्ट करायला आपला फोन देते. मलेशियाचा मित्र तिला सांगतो की, तू त्याच्याशी लग्न कर. तरच तुला तिथून पळून जाता येईल. म्हणून ती ताहीरशी लग्न करते. प्रेमात असल्याचे  नाटक करते. त्याला सांगते की, एक विधी केला तर तिला दहा लाख रुपये भारतातून मिळतील. ताहीरला तिचे बोलणे खरे वाटते आणि ती इंडियन अॅम्बेसीपर्यंत पोहोचते. हा सगळा तिचा प्रवास. एक भयाण सत्य पडद्यावर पाहताना मनात थरार निर्माण करतो. चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत या थराराला सहाय्य करते. शेवटच्या चाळीस मिनिटांत होणारा पाच तासांचा प्रवास खूपच थरारक आहे. पाच तासांच्या पाच टप्प्यावर त्यांना दिले जाणार संरक्षण बदलणार आहे. एकदा तर संरक्षण देणारी टीम निघून जाते आणि दुसरी यायला उशीर होतो अशा स्थितीत आपल्याकडे कोणतेही युद्धाचे साहित्य नसताना उज्माला वाघा बॉर्डरपर्यंत पोहोचवणे किती अवघड आहे हे आपल्याला चित्रपट पाहताना जाणवते. अर्थात ही सत्यकथा असल्यामुळे उज्मा या देशात परत येते.

जेपीच्या प्रमुख भूमिकेत जॉन अब्राहम यांनी सुंदर अभिनय केला आहे आणि उज्माच्या भूमिकेत सादिया खतीब हिने या भूमिकेला न्याय दिलेला आहे. हा चित्रपट पाहायलाच हवा असा आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत))

Comments are closed.