Ashadhi Wari 2025 Maharashtra Government announcement GR issued


मुंबई : यंदाच्या वर्षी संतांचा आणि वारकऱ्यांचा वारसा जपणाऱ्या वारकऱ्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळणार आहे का नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. यामुळे वारकऱ्यांच्या मनात नाराजीचे सूर उमटत असल्याची चर्चा होती. पण अखेर आषाढी वारी 2025 च्या पार्श्वभूमीवर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून या निर्णयाचा शासन निर्णय (GR) राज्य सरकारने जारी केला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पालखीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी 20 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. (Ashadhi Wari 2025 Maharashtra Government announcement GR issued)

हेही वाचा : Congress : कर्जमाफीसाठी समितीचा खेळ करू नका, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा; काँग्रेसने दिला हा इशारा 

सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. त्यानुसार गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20 हजार रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे 5 हजार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे. तसेच आषाढी वारीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी होणार असून यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.



Source link

Comments are closed.