पंढरीला निघालेल्या भोळ्याभाबड्या वारकऱ्यांना फसवलं, विठुरायाच्या दर्शनाचे बोगस पास विकले, पोलिस
अशाधी गंध 2025: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) लाखो वारकरी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत वाटचाल करत असताना, काही फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी या भक्तिभावाला काळिमा फासणारा प्रकार घडवला आहे. थेट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या काही भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बनावट ‘टोकन दर्शन’ पास विकल्याची घटना समोर आली आहे.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास 100 रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र जेव्हा हे भाविक आज विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेऊन चौकशी सुरू केली. मात्र, त्यांना हे पास कोणी तयार करून दिले? याबाबत माहिती सांगता आली नाही आले नाही. त्यानंतर प्रशासनाने या भाविकांना पोलिसांकडे पाठवले असून बोगस पास रॅकेट उघड करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.
भाविकांची फसवणूक का होतेय?
सध्या आषाढी वारीदरम्यान विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना 10 ते 12 तासांपर्यंत रांगेत थांबावं लागतं, तर अधिकृत टोकन प्रणालीमुळे अर्ध्या तासात थेट दर्शनाचा लाभ मिळतो. याचाच गैरफायदा घेत काही भामटे बनावट पास बनवून फसवणूक करत आहेत. फसवणूक झालेल्या भाविकांनी सांगितले की, सासवडच्या दरम्यान त्यांना हे पास मिळाले. त्यामुळे हा प्रकार वारीच्या मार्गातच कुठे तरी घडत असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून, यापुढे कुणीही असे पास विकताना आढळल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी सर्व भाविकांना अधिकृत संकेतस्थळावरूनच मोफत टोकन बुक करण्याचे आणि अशा बनावट पासांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
पंढरपूरमध्ये मांस विक्रीवर बंदी
आषाढी वारीचा पावन सोहळा जवळ येत असून, लाखो वारकरी पालख्या घेऊन पंढरीच्या दिशेने आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले आहेत. या वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी उघडपणे मास-मटन विक्री करणारी दुकाने दिसून येतात. अगदी पंढरपूरमध्ये प्रवेश करतानाही विविध मार्गांवर अशी दुकाने आढळतात. गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि वारकरी संप्रदायातील संत मंडळी यात्रा कालावधीत पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गावरील गावांमध्ये मास-मटन विक्री बंद ठेवावी, अशी मागणी करत होते. या वर्षी अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच, यात्रेच्या कालावधीत सलग 10 दिवसांसाठी पंढरपूरमध्ये मास-मटन विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. ही बंदी लागू केल्यामुळे वारकरी संप्रदायात आनंदाची भावना व्यक्त केली जात असून, वारीचे पावित्र्य आणि भक्तिभाव जपण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.