Ashok Chavan criticizes Congress as Jayshree Patil from Sangli will join BJP


दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. याचपार्श्वभूमीवर आता भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला मोठे धक्के बसताना दिसत आहेत. नाशिकमधील शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज (17 जून) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यानंतर आता दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. याचपार्श्वभूमीवर आता भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. (Ashok Chavan criticizes Congress as Jayshree Patil from Sangli will join BJP)

जयश्री पाटील भाजपा प्रवेश करणार असल्यासंदर्भात अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा नेतृत्वहीन झाला आहे. काँग्रसे पक्ष आता नात्यागोत्यांचा राहिला असल्यामुळे तिथे कोण थांबणार? खरं तर काँग्रेस  पक्षाची अवस्था ही विशेषता महाराष्ट्रामध्ये नात्यागोत्यांचा पक्ष अशी झाली आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून प्रेरणा देण्यासारखं कुठलंही काम होत नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.

अशोक चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी पक्षावर टीका टिपण्णी करणे हे विरोधी पक्षाचे काम असलं तरी फक्त टीका करून राज्य चालत नाही. त्यासाठी काही कष्टही करावे लागतात, राज्याच्या विकासाचा रोड मॅप तयार करावा लागतो. टीम बरोबर घेऊन त्यांना उत्साहाने काम करण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने यातील कुठलीच बाब महाराष्ट्रात होताना दिसत नाही. त्यामुळे स्वाभाविक आहे लोक किती दिवस वाट पाहतील. सांगलीत ज्या घडामोडी घडल्या आहेत, कारण काँग्रेस आता नेतृत्वहीन झाली आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडणारच, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

हेही वाचा – Sudhakar Badgujar : ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो…; बडगुजर यांचा ठाकरे गटाला इशारा

काँगेसच्या काळात विकास झाला नाही का? असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले की, या प्रश्नाचा रोख माझ्याकडेच आहे, हे मला कळले आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की, काँगेसच्या काळातही विकास झाला, मात्र जो विकास मागच्या अकरा वर्षात झाला तो अधिक गतीने झाला आहे. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पर्यंत करण्याचं धोरण ठेवले आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

जयश्री पाटील 18 जून रोजी करणार भाजपात प्रवेश

जयश्री पाटील यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. यानंतर जयश्री पाटील यांना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर होती. त्यामुळे जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जयश्री पाटील मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात उद्या (18 जून) सकाळी पक्षप्रवेश करणार आहेत.

हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांकडून एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम; अजितदादांची एका वाक्यात प्रतिक्रिया



Source link

Comments are closed.