Asia Cup साठी कधी रवाना होणार टीम इंडिया, पहिला सामना कोणासोबत? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही

एशिया कप 2025 अद्यतनः आशिया कप 2025 विषयीची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. नुकतेच या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून भारत-पाकिस्तान सामन्यामुळे देशभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर वादाचा मुद्दा तापला आहे. सोशल मीडियापासून ते संसदेपर्यंत या सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. भारतीय संघ कधी यूएईला रवाना होणार? पहिला सामना कोणासोबत? आणि भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? ते जाणून घेऊया.

भारतीय संघ कधी जाणार यूएईला?

आशिया कप 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमीरात (UAE) येथे पार पडणार आहे. ESPN Cricinfoच्या माहितीनुसार, भारतीय संघ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात यूएईसाठी रवाना होणार आहे. याआधी भारतात दिलीप ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाणार आहे, जी 11 सप्टेंबर रोजी संपेल. या स्पर्धेत तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद शमी यांसारखे काही प्रमुख खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा भारतीय खेळाडूंना आशिया कपपूर्वीचा सराव करण्यासाठी एक चांगली संधी ठरणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही?

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यावरून जोरदार राजकीय वातावरण तापले होते. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने या सामन्यास परवानगी दिली आहे, कारण हा सामना भारतात नाही, तर UAEमध्ये होणार आहे. पूर्वी भारताला या स्पर्धेची यजमानपद मिळणार होती, पण Asian Cricket Council (ACC) च्या वार्षिक बैठकीत बीसीसीआयने स्पर्धा न्यूट्रल वेन्यूवर खेळवण्याची संमती दिली. त्यामुळेच आता संपूर्ण आशिया कप यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. सद्यस्थितीत भारत-पाकिस्तान सामना रद्द होईल, अशी कोणतीही अधिकृत घोषणा ना बीसीसीआयकडून झाली आहे, ना भारत सरकारकडून, त्यामुळे सामना होईल.

भारताचा पहिला सामना कधी?

जाहीर वेळापत्रकानुसार, भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी युएई विरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान आणि 19 सप्टेंबरला भारत विरुद्ध ओमान सामना खेळला जाईल. या साऱ्या घडामोडी लक्षात घेता, आशिया कप 2025 हा फक्त एक क्रिकेट स्पर्धा न राहता, राजकीय आणि भावनिक दृष्टीनेही खूप महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय चाहत्यांची नजर आता या स्पर्धेवर खिळलेली आहे.

हे ही वाचा –

BCCI on Jasprit Bumrah : बुमराहला धक्का! खेळाडूंच्या मनमानी कारभारावर बीसीसीआयचा हातोडा, आता नवीन नियमात सर्वांना शिस्त लावणार

आणखी वाचा

Comments are closed.