टीम इंडियाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही?; अखेर खरं कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?


एशिया कप ट्रॉफी इंड. वि पीएके फायनल: आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) काल (28 सप्टेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. तिलक वर्माच्या (Tilak Verma) नाबाद 69 धावांच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) एकावेळी अशक्यप्राय वाटत असलेला विजय प्राप्त केला. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने मैदानात पाकिस्तानी संघातील कोणत्याही सदस्याशी हात मिळवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) यांच्यात मैदानात आणि मैदानाबाहेर वादांची मालिका सुरु झाली होती.

भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला. कारण आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आशिया चषकाची आता जगभरात चर्चा सुरु आहे. याचदरम्यान टीम इंडियाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही?, याबाबतचं कारण समोर आलं आहे.

भारतीय संघाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही? (Why didnt team india take Asia Cup trophy?)

पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला. भारताने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही, यामागील कारण आता समोर आलं आहे. भारताच्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही. “पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे, असं देवजीत सैकिया (Devajit Saikia) म्हणाले.

नेमकं काय घडलं? (Asia Cup Trophy Controversy)

एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळंच भारतीय संघानं मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय संघाच्या या जिद्दानंतरही मोहसीन नक्वी देखील ट्रॉफी देण्यासाठी हट्ट करत होते. त्यानंतर ट्रॉफी न घेण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. शेवटपर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी घेतली नाही. अखेर ट्रॉफी न घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला.

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

Shoaib Akhter Ind vs Pak Asia Cup Final 2025: भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं…

आणखी वाचा

Comments are closed.