क्रिकेटवारी – फलंदाजांची कसोटी लागणार
>>
20 जून रोजी लीड्सला टॉस जिंकल्यावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना हिंदुस्थानी कप्तान शुभमनचं मन किंचितही डोलावलं तर पाच कसोटींच्या मालिकेचा निकाल काय असणार ते समजून जा! कारण इंग्लंडमध्ये याच हलण्या-डोलणाऱ्या मनाची आणि चेंडूंची कसोटी पास करावी लागते.
शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, ऋषभ पंत या कसोटीवर उतरताना किती आत्मविश्वास आणि संयम दाखवतात ते पाहणं म्हणजे बोर्डावर लागलेल्या दहावीच्या निकालपत्राकडे बघण्यासारखंच असेल. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग अन् सीम होतो. कधीमधी फणा उगारून आतंकही माजवतो! म्हणूनच, हिंदुस्थानी खेळपट्ट्यांवर पाय पुढे टाकून आय.पी. एल. झोडपल्यानंतरच्या गुंगीतून बाहेर पडणं अत्यावश्यक ठरेल.
साई सुदर्शन आणि नऊ वर्षांपूर्वी तामीळनाडूच्या चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच तिहेरी शतक झळकावणाऱ्या करुण नायरला याच परीक्षा द्याव्या लागणार आहेत. जेम्स अॅण्डरसन गेल्या वर्षी निवृत्त झालाय, पण ख्रिस वोक्स, ऑली स्टोन आणि जॉश टंग त्याच्याच मार्गदर्शनाखाली मैदानात उतरणार आहेत. इंग्लंड संघासाठीचं पूरक हवामान, स्विंग, सीम होणाऱ्या खेळपट्ट्या, अनुभवी आणि दिग्गज अॅण्डरसनचं शस्त्रास्त्र भंडार हे सगळं हिंदुस्थानी फलंदाजांसाठी मुंबईच्या मुसळधार पावसात खड्ड्यांनी भारलेला हायवे ओलांडण्यासारखं ठरणार आहे. इथेच कर्णधार गिलचं कौशल्य पणाला लागेल. मैदानावर उतरणाऱ्या हिंदुस्थानी फलंदाजांना, गोलंदाजांना तो किती अन् कसा हाताळतो हे पाहण्यासारखं असेल. त्याशिवाय गिलला त्याच्यातल्या फलंदाजालाही ताजंतवानं ठेवणं गरजेचं असेल. ही तारेवरची कसरत करताना त्याला त्याच्या गोलंदाजांकडून मोठी मदत लागेल.
अर्थात, घायाळ अन् अति-ताणाने ग्रस्त झालेल्या जसप्रीत बुमराला इंग्लंडचं हवामान आणि खेळपट्ट्या उभारी देतील. मोहम्मद सिराजला आपल्या उत्साहावर नियंत्रण राखावं लागेल. तिसरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगने जर आपली दिशा अन् टप्पा सांभाळला तर इंग्लंडला आटोक्यात ठेवणं रवींद्र जडेजासाठी कठीण पडू नये. दुसरा स्पिनर कुलदीप यादव असावा. तो परिणामकारक ठरू शकेल. कारण वॉशिंग्टन सुंदरच्या ऑफ स्पिनपेक्षा कुलदीपचा चायनामन इंग्लिश फलंदाजांना अधिक छानपणे कोड्यात पकडू शकेल. आता जास्तीचा फलंदाज घ्यायचा की सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा हा निर्णय मात्र कप्तान गिलचा दमखम दाखवून देईल!
इंग्लंडची मदार असेल झॅक क्राऊली, बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि ज्यो रूटवर. गेल्या वर्षी रूटने दीड हजार धावा केल्यात आणि तो आक्रमक ब्रूकच्या साथीने ‘बॅझबॉल’ हातखंडा अवलंबू शकेल. एकूणात, गिलच्या संघाचं यश रोहित, विराट आणि अश्विनच्या अनुपस्थितीत किती जिगर दाखवतो यावर अवलंबून असेल. 1932 पासून हिंदुस्थानचा हा विसावा इंग्लंड दौरा आहे. आता संघातल्या किती खेळाडूंना हा दौरा ‘विसावा’ देणारा ठरतोय हे लवकरच पाहायला मिळणार आहे!
श्रेयस अय्यर रागावले नाही!
गेल्या एक वर्षात त्याने रणजी स्पर्धेमध्ये 68.57 च्या सरासरीने 480 धावा बडवल्या. रणजी, इराणी आणि सय्यद मुश्ताक अली चषक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी खिशात घातली तेव्हाही श्रेयसच्या फलंदाजीमुळेच अनेक महत्त्वाच्या विजयी पायऱ्या आपण चढू शकलो. यंदा आयपीएलमध्ये पंजाबचं नेतृत्व करताना त्यानेच संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं होतं. केवळ 17 सामन्यांत 175च्या स्ट्राईक रेटने सहाशेपार धावा सरसरवल्या…
मात्र इंग्लंडच्या दौऱ्यासाठी अजित आगरकरच्या निवड समितीला श्रेयस अय्यरची आठवण नाही आली. यापूर्वीच्या इंग्लंड दौऱयानंतर तो आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना ‘अवघडतो’ असा शिक्का मारला गेला अन् मग स्थानिक स्पर्धांकडे दुर्लक्ष करण्याचं कारण पुढे केलं गेलं. आता उपरोल्लेखित हजारभर धावा त्याने ङ्खोकल्या तेव्हा त्याला टप्पे-टप्पे गोलंदाजी केली की तीन स्थानिक आणि एका आंतरराष्ट्रीय चषकावर हिंदुस्थानने कब्जा केला तेव्हा मैदानावर श्रेयसचं भूत हजर होतं एवढं मात्र स्पष्ट व्हायला हरकत नसावी. आज श्रेयस आपल्या घरी हात चोळत बसला असेलही. पण त्याने तसंच बसावं. हात गरम राहतील. संधी समोर आली की दोन्ही हातांनी त्याला ती साधता येईल.
Comments are closed.