Awhad’s criticism on caste system regarding Namdev Dhasal


(Chal Halla Bol movie) मुंबई : दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कात्रीत सापडला आहे. ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा उर्मट प्रश्न विचारत आणि त्यांच्या कवितेला आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या प्रदर्शनास परवानगी नाकारली आहे. यावरून तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत जातीयवादी व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला आहे. (Awhad’s criticism on caste system regarding Namdev Dhasal)

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणतात, तथाकथित संस्कृती रक्षकांना आव्हान उभे करणारे नेहमी शत्रूच वाटत असतात. ही परंपरा चार्वाकापासून सुरू झाली आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यापर्यंत या परंपरेचे बळी ठरले आहेत. महात्मा फुले यांच्यावर मारेकरी घालणारे आणि राजर्षी शाहू महाराज यांना छळणारे, हे सर्वच मनुचे वाहक आहेत. याच मनु-मानसिकतेने दाभोलकर-पानसरे यांचा बळी घेतला. आता तेच लोक विचारत आहेत, कोण नामदेव ढसाळ? असे सांगत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

नामदेव ढसाळ हा माणूस नव्हता तर तो विचार होता, समष्टीसाठी लढणारा पँथर होता. “सत्तेत जीव रमत नाही,” असे म्हणत “सूर्याच्या रथाचे सात घोडे” उधळवणारा सामाजिक समतेच्या लढ्यातील सारथी होता. नामदेव ढसाळ हा “हाडकी हाडवळ”च्या अंधारयात्रेतील “सत्यता” सांगून माणसातील पँथर जागा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करणारा विद्रोही होता, असे सांगत आव्हाड म्हणतात, हा बंडखोर नायक सेन्सॉर बोर्डवाल्यांना माहीत नसेल तर, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. नामदेव ढसाळ जेव्हा कधी भेटले, तेव्हा त्यांनी विद्रोहाची हाक दिली. या जातीयवादी व्यवस्थेला तेव्हाही त्यांचा राग होता, आता ते आपल्यात नसताना त्यांचा द्वेष केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – Yogesh Kadam : विरोधकांनी विधानाचा विपर्यास केला, टीकेनंतर मंत्री योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

काय आहे प्रकरण?

नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ सिनेमा 1 जुलै 2024 रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला होता. पण, सिनेमातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांनी मांडले. विशेषत:, या सिनेमातील ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो…’ या कवितेवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यावर कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही, असे उत्तर या अधिकार्‍यांनी दिले. एवढेच नाही तर या कविता सिनेमातून वगळाव्यात, असे सेन्सॉर बोर्डाने लेखी कळवले आहे.

हेही वाचा – Namdeo Dhasal : Nonsense लोकांना नेमले म्हणूनच…, रोहित पवारांचा सेन्सॉर बोर्डासह सरकारवर निशाणा





Source link

Comments are closed.