देशात प्रदूषणामुळे सुमारे १७ लाख लोकांचा मृत्यू! अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्या या आकडेवारीचा आधार काय? वाचा संपूर्ण माहिती

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) माजी अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये (WEF) बोलताना हिंदुस्थानापुढील सर्वात मोठ्या संकटावर बोट ठेवले आहे. सध्या हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेसाठी जागतिक व्यापार शुल्कापेक्षा (Tariffs) ‘वायू प्रदूषण’ हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोपीनाथ यांनी जागतिक बँकेच्या (World Bank) अभ्यासाचा हवाला देत सांगितले की, हिंदुस्थानात दरवर्षी प्रदूषणामुळे सुमारे १७ लाख लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा हिंदुस्थानातील एकूण मृत्यूंच्या १८ टक्के इतका आहे.

हा १७ लाखांचा आकडा प्रामुख्याने ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ (GBD) या अभ्यासातून समोर आला आहे. मूळतः जागतिक बँकेने सुरू केलेल्या या प्रकल्पात उपग्रहाद्वारे मिळवलेली माहिती, लोकसंख्या सर्वेक्षण आणि विविध रोगांची आकडेवारी यांचा वापर करून एक गणिती मॉडेल तयार केले जाते. २०१९ च्या अहवालात हिंदुस्थानचा वायुप्रदूषणामुळे होणारा मृत्यूदर १.६७ दशलक्ष (१६.७ लाख) इतका नोंदवण्यात आला होता.

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका

प्रदूषणामुळे केवळ लोकांचे प्राण जात नाहीत, तर अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान होत आहे. ‘लॅन्सेट काउंटडाउन’ (2025) अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे अकाली गेलेल्या प्राणांचे आर्थिक मूल्य सुमारे ३३९ अब्ज डॉलर्स इतके आहे.

हे हिंदुस्थानच्या एकूण जीडीपीच्या (GDP) ९.५ टक्के इतके प्रचंड आहे.

वायू प्रदूषणामुळे आजारपण वाढते, ज्यामुळे उत्पादक मानवी तास (Productive Hours) वाया जातात.

प्रदूषणाच्या समस्येवर तज्ज्ञांचे मत

स्वच्छ हवा मोहिमेच्या कार्यकर्त्या ज्योती पांडे लावाकरे यांनी गोपीनाथ यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. त्या म्हणतात, ‘जेव्हा अर्थव्यवस्था वाढत असते, पण ती वाढ नेब्युलायझर, एअर प्युरिफायर आणि केमोथेरपीच्या विक्रीतून येत असेल, तर आपण चुकीच्या दिशेने जात आहोत’.

तसेच, ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ (2024) मधील एका संशोधनानुसार, जर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांचा विचार केला, तर प्रदूषणाने होणाऱ्या मृत्यूंचा आकडा यापेक्षाही कितीतरी जास्त असू शकतो.

गीता गोपीनाथ यांनी दावोस येथे भारतातील 1.7 दशलक्ष वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा उल्लेख केला आहे

माजी आयएमएफ अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी चेतावणी दिली की वायू प्रदूषण हा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी शुल्कापेक्षा मोठा धोका आहे, ज्यामुळे दरवर्षी 1.7 दशलक्ष मृत्यू होतात.

Comments are closed.