Bawankule’s advice to Rahul Gandhi not to mislead the country
आकडेवारीचे अपूर्ण विश्लेषण करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. आपले अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
(Maharashtra Election 2024) मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखाद्वारे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. ही लोकशाहीतील मॅच फिक्सिंग असल्याचे म्हणत, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाचा हवाला देत मतदानाची आकडेवारी दिली आहे. यात प्रामुख्याने त्यांनी भाजपाला लक्ष्य केल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. डेटाचे अर्धेच विश्लेषण करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, असे त्यांनी सुनावले आहे. (Bawankule’s advice to Rahul Gandhi not to mislead the country)
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत खासदार राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात पाच महिन्यांत 39 लाख मतदारांची झालेली वाढ ‘संशयास्पद’ असल्याचे राहुल गांधी म्हणतात. पण 2009मध्ये काय झाले होते? एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते, तर, ऑक्टोबर 2009च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 7 कोटी 59 लाख 68 हजार झाली होती. त्यावेळी फक्त महिन्यांत मतदारांची संख्या 30 लाखांनी वाढली होती, याचे स्मरणही चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिले आहे.
हेही वाचा – Maharashtra Election : भाजपाचा स्ट्राइक रेट 32 टक्क्यांवरून 89 टक्के झाला, राहुल गांधींनी दिली आकडेवारी
त्यावेळी निवडणूक आयोगावर विश्वास होता का? की त्यावेळीही काँग्रेस आणि आयोगामध्ये काही हातमिळवणी होती? त्यावेळी काही गैरप्रकार केला होता का? असे प्रश्न विचारत बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्याकडे उत्तरे मागितली आहेत. 2004 आणि 2009मध्ये काँग्रेस जिंकल्यावर कोणतेही प्रश्न उपस्थित झाले नाहीत आणि आज जेव्हा काँग्रेसचा पराभव झाला, तेव्हा कांगावा सुरू केला, असा पलटवार त्यांनी केला आहे.
आकडेवारीचे अपूर्ण विश्लेषण करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. आपले अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसला नाकारले आणि आता बिहारमधील जनताही बाहेरचा रस्ता दाखवेल. या भीतीमुळे राहुल गांधी हे आधीच पराभवाचे कारणे तयार करत असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील जनतेने आमच्या महायुतीला बहुमताने निवडून दिले आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास पुढील निवडणुकीतही अढळ राहील, असा विश्वास व्यक्त करून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, वारंवार खोटे बोलून राहुल गांधी राज्याच्या जनादेशाचा अपमान करत आहेत. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.
हेही वाचा – Sanjay Raut : महाराष्ट्राची निवडणूक हायजॅक करण्यात आली, राहुल गांधींच्या आरोपांना राऊतांचे समर्थन
Comments are closed.