Bharat Gogawale Shivsena on allegations of black magic Maharashtra Politics


मुंबई : गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले हे अनेकदा वादात सापडले आहेत. राज्याचे रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री असलेले भरत गोगावले हे नेहमीच केलेल्या विधानांमुळे चर्चेत असतात. नुकतेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांनी मांत्रिकांना बोलावून अघोरी पूजा केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता महायुतीमधीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर स्वतः भरत गोगावले यांनी या सर्व आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी हे आरोप केला जात असल्याचे ते म्हणाले. (Bharat Gogawale Shivsena on allegations of black magic Maharashtra Politics)

हेही वाचा : Bharat Gogawale : राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट; पालकमंत्रिपदाचा केला उल्लेख 

मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, “मी प्रामाणिकपणे काम करत आहे. ती कोणतीही अघोरी पूजा नव्हती तर ती एक साधी पूजा होती. मला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळू नये आणि आपण अडचणीत यावे, म्हणून हे असे माझ्यावर आरोप केले जात असावेत,” असे ते म्हणाले आहेत. झालेल्या आरोपांवर ते पुढे म्हणाले की, “आमच्या घरी रोज जनता दरबार असतो. मी ग्रामीण भागातील मंत्री असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकं सकाळी लवकर येत असतात. जो कोणी अशी अघोरी विद्या करत असेल तो असे व्हिडिओ काढेल का?” असा सवाल त्यांनी केला.

आम्ही केलं तर ती अघोरी विद्या आणि तुम्ही केलं तर?

मंत्री भरत गोगावले यावर म्हणाले की, “आम्ही कुठे देवदर्शनाला गेलो की ती अघोरी विद्या आणि तुम्ही कुठे गेलात तर ते काय नसते. ज्याला कर नाही त्याला डर नसावे. ज्याची नियत चांगली आहे, त्यांनी कधी घाबरायचे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतील मावळे आहोत. आम्ही कधी चुकीचे करणार नाही,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, ” आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणताही विचार न करता बाहेर पडलो, ते उबाठाला झोंबले आहे. त्यानंतर पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीला झोंबत असेल. त्यामुळे विरोधक आमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आणखी शोधात बसावे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. आम्ही धार्मिक लोकं आहोत, आम्ही स्वच्छ मनाचे लोकं असल्यामुळेच आम्हाला लोकांनी चार चार वेळा निवडून दिले आहे, असेही ते म्हणाले.



Source link

Comments are closed.