Bhaskar Jadhav, who is in the news due to his displeasure, clearly stated
रत्नागिरी : नुकताच शिवसेना पक्षाचा वर्धापन सोहळा पार पडला. दोन्ही शिवसेना गटाने आपापला सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला. पण या सोहळ्यावेळी ठाकरे गटातील काही नेतेमंडळी नाराज असल्याची चर्चा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने नाव समोर आले ते आमदार भास्कर जाधव यांचे. याच चर्चांवर आता स्वतः भास्कर जाधव यांनी भाष्य केले आहे. आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी (ता. 23 जून) रत्नागिरी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. पण त्याआधी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. मी सगळ्यांशी बोलून आणि विश्वासात घेऊन माझा निर्णय योग्य की अयोग्य, हे पडताळून पाहत आहे, असे जाधवांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. (Bhaskar Jadhav, who is in the news due to his displeasure, clearly stated)
आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून घेतले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मी ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतल्याचे जाधवांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, पक्षाने कोणतीही जबाबदारी न देताबही त्यांनी परस्परच रत्नागिरीतील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत असल्याची घोषणा केली. मी ही जबाबदारी नुसती अंगावर घेऊन थांबणार नाही तर पक्षाला यश मिळवून देईल, असा दावा जाधव यांनी केला आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे खरंच पक्षात नाराज आहेत का? असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
हेही वाचा… Thackeray on Modi : मोदी मणिपुरात जाण्याचा ‘योग’ काही येत नाही, ठाकरेंची घणाघाती टीका
पण या नाराजीच्या चर्चेवर भाष्य करत आमदार भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील माझ्या भाषणात नाराजीचा लवलेश दिसला का? मी कशाला नाराज होईन? मी ही जबाबदारी घेणार असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावे लागले. परस्पर एखादा निर्णय घेण्याचा किंवा घोषणा करण्याचा माझा स्वभाव नाही. मी सगळ्यांशी बोलून आणि विश्वासात घेऊन माझा निर्णय योग्य की अयोग्य, हे पडताळून पाहत आहे. त्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, आठवेळा निवडणूक जिंकल्यावर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. मी कोणावर नाराज नाही किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितले नाही. माझ्यामध्ये अजूनही लढण्याची धमक आहे आणि संघर्ष करण्याची इर्षा आहे, असेही यावेळी भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले.
तसेच, 2022 साली जी घटना पक्षात घडली, त्यानंतर मी मैदानात जाऊन लढत आहे, हे नाराजीचे संकेत आहेत का? मी अजूनही होतो त्याचठिकाणी ठामपणे पाय रोवून उभा आहे. सातत्याने स्वत:च सर्टिफिकेट देणे, हे मला जमत नाही. मी हे करणार, ते करणार, असे मी सांगत बसत नाही. मी गोष्टी आधी करतो, मग सांगतो. नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय, हे कोणालाही सांगता येत नाही. मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी स्वत:हून अंगावर घेत आहे. मी नुसता मैदानात उतरणार नाही तर पक्षाला यश मिळवून देण्यासाठी उतरणार आहे. याला नाराजी कसे म्हणायचे, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यामुळे येणाऱ्या काळात भास्कर जाधव ठाकरे गटात राहतात की अजून कुठे जातात, याकडे सर्वांतेत लक्ष लागलेले आहे.
Comments are closed.