भाजप दाऊद, छोटा शकील आणि टायगर मेमनलाही पक्षात सामील करून घेतील; संजय राऊत यांचा घणाघात

भाजप हा बकवास, ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा पक्ष आहे, फोडा, झोडा आणि राज्य करा हे भाजपचे हे धोरण आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच भाजप दाऊद, छोटा शकील आणि टायगर मेमनलाही भाजपमध्ये सामील करून घेतील असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधू आहेत. जरी त्यांचे पक्ष स्वतंत्र असले तरी ते दोघे शेवटी भाऊ आहेत. आमच्या सारख्या चाहत्यांना नक्की खात्री आहे की महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी असे निर्णय घेतले जातील. या राज्याचे मुख्यमंत्री हे राजकारणातले कारस्थानी गृहस्थ आहेत. त्यांची कोणतीही चाल सरळ नसते. आणि मराठी माणसासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी असतच नाही. पण मी मुख्यमंत्र्यांना दोष नाही देणार कारण फोडा, झोडा आणि राज्य करा हे भाजपचे हे धोरण आहे. हिंदुंची, मराठी माणसांची एकजूट तोडा हे त्यांचे धोरण आहे. आणि मग त्यासाठी त्यांना सलीम कुत्ताही चालतो, इक्बाल मिरचीही चालतो आणि उद्या दाऊद इब्राहिमही चालेल. हे त्या पक्षाचे धोरण आहे आमचे तसे धोरण नाही. आम्ही एक वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत. काल जसे शरद पवार यांनी एक भूमिका मांडली की भाजपसोबत जाणाऱ्यांसोबत हात मिळवणी करणार नाही. हे त्यांच पक्क धोरण आहे. शरद पवार अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृ्त्तींना जवळ करणार नाही. शाहु-फुले-आंबेडकर ही जसा राज्याचा विचार आहे, तसे बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे, महाराष्ट्र एकसंध ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी लढण्याचा त्यामध्ये आम्ही तडजोड करणार नाही. आणि जे काही संधीसाधू भाजपमध्ये गेले असतील त्यांचा विचारही आम्ही करत नाही. पण भाजप असो किंवा एसंशि गट असेल त्यांना असे भ्रष्ट, व्यभिचारी, गुंड, दाऊदचे हस्तक असे लोक लागतात.

खरं म्हणजे भाजपने आता सलीम कुत्ताला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. कारण ज्या व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे ती व्यक्ती शिवसेनेत असताना त्यांनी सलीम कुत्तासोबत संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. की आम्ही देशद्रोही लोकांसोबत काम करतो असा प्रचार केला. पण आता तुम्ही देशद्रोही लोकांच्या खिशामध्ये जाऊन बसला आहात. आम्हालाही हे लोक देशद्रोही म्हणाले होते, यांचे बापजादेसुद्धा नव्हते तेव्हापासून आम्ही या देशासाठी काम करत आहोत. भाजपचा आता जन्म झाला आहे. माझ्या पक्षाला 60 वर्ष झाली आहेत असे संजय राऊत म्हणाले.

भाजपचे नेते पलटूराम आहेत. भाजप हा अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराचा मूळ पक्ष राहिलेला नाही. प्रफुल पटेल यांचे दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीसोबत संबंध आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्याच्या जमिनी लाटल्या, देशांच्या सैनिकांशी गद्दारी केली हे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. पंतप्रधान मोदींनी श्वेतपत्रिका काढली होती. सलीम कुत्ता हे प्रकरण भाजपने काढलं, फडणवीसांनी एसआयटी लावली होती, त्या एसआयटीचं काय झालं? सलीम कुत्ताला तुरुंगातून आणून तुम्ही तुमच्या पक्षात आणलं का? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सलीम कुत्ता वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? या लोकांच्या मनातले प्रश्न आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

भाजप हा बकवास, ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा पक्ष आहे. भाजपसारखा देशद्रोही पक्ष देशाच्या इतिहासात झालेला नाही. देशद्रोही हा भाजपला लागू पडतो, कारण सगळे भ्रष्ट आणि देशद्रोही लोक त्या पक्षात निघाले आहेत. भाजपने ज्यांच्यावर देशद्रोहाचे, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते सगळे लोक भाजपमध्ये आले. उद्या मुस्लिमांची मतं हवीत म्हणून दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये आणतील. मला या लोकांचा काही भरवसा नाही. पाकिस्तानसोबत डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांना भाजपमध्ये सामील करून घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. देशाची सत्ता यांनी भ्रष्ट आणि देशद्रोही लोकांच्या आधारानेच त्यांनी मिळवली आहे. संपूर्ण देश आणि राज्यात हाच धुमाकूळ सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेतात. तुम्ही संघाचे लोक आहात यावर मोहन भागवत यांनी भाष्य करायला हवं. तुम्ही संघाच्या संचालनाला जाता ना? तुमच्या हातात तिरंगा का नसतो हे आम्हाला आता कळालं. तुमच्या हातात आणि मुख्यालयात तिरंगा का नाही हे आता या पिढीला कळायला लागलं आहे असे संजय राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्ष हा भंगार गोळा करून मोठा झाला आहे. दहशत, यंत्रणा आणि पैश्यांच्या जोरावर असे लोक गोळा करायचे. या पक्षाकडे स्वतःचं काय आहे? यांच्या पक्षातील 90 टक्के आमदार हे दुसऱ्या पक्षातले आहेत.

हिंदी सक्तीबाबत संसदेत आम्ही पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारू. आमच्याकडे ती आयुधं आहेत, आमच्याकडे खासदार आहेत. आणि आमच्यासह इतर खासदार पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरातचेही खासदार आमच्यासोबत येतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे ठरवलं जातं ते भाजप आपल्या राजकीय सोयीसाठी ठरवलं जातं. आम्हाला हिंदी भाषा चांगली येते. किंबहून मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा मुंबईत आम्ही उत्तम हिंदी भाषा बोलतो. मुंबईत मोठ्या प्रमाणात हिंदी भाषी लोक आहेत. महानगरपालिका अनेक वर्ष हिंदी शाळा चालवते अनेक वर्षांपासून. आमचा हिंदीला विरोध नाही पण तुम्ही शाळांमध्ये या भाषेची सक्ती करू नका. हिंदी ही देशाची भाषा आहे, संसदेत आणि हिंदीतच बोलतो. आमचं नरेंद्र मोदींसारखं नाही, सायप्रसला जायचं आण हिंदीत बोलायचं. आम्ही सायप्रसला जाऊन इंग्रजीत बोलू असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.