BLOG : भाजप आणि शिंदेसेना युतीचा नवा अध्याय…
ब्लॉग: तरुण-तरुणी नव्यानं प्रेमात पडतात, तेव्हा सगळं जग गोडगुलाबी वाटू लागतं. पण जसजसं प्रेम पुढं सरकतं, जबाबदारी वाढत जाते, तसतसं मग तेच प्रेम नको वाटू लागतं. अगदी राजकारणातील पक्षांच्या युतीसारखं. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पाडण्याची आणि शिदेंना सोबत घेण्याची गरज भाजपला जास्त होती. पण आता ‘गरज सरो आणि मित्रपक्ष मरो’ या नइती प्रमाणे भाजपला शिंदे नको झालेत का? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. त्याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यात सुरू झालेला पक्ष फोडाफोडीचा खेळ.
तसं तर या खेळाची सुरुवात तशी फार आधीपासूनच झाली. पण हा खेळ खरा रंगात आला, भाजपनं शिंदे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील डोंबिवलीचे शिवसेना दिवंगत नेत वामन म्हात्रेंचा मुलगा अनमोल म्हात्रेंना आपल्या पक्षात घेतलं. अन् राजकुमारांचा बालेकिल्ला भाजप कमकुवत करत असल्याचं दिसताच शिंदेंच्या शिलेदारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत मुख्यमंत्र्यांचं दालन ठोठावलं. हे सगळं मंगळवारी(१8 नोव्हेंबर) रंगलेलं नाट्य आपण पाहिलंच असेल. पण शिंदेंच्या सेनेचं मपूळ दुखः भाजप आपला पक्ष फोडत असल्याचं नाही तर आपल्याविरोधात प्रतिस्पर्धी तयार करत असल्याचं आहे.
मध्यवर्ती गृहमंत्री अमित शाहांनी आपली मनिषा अनेकदा बोलून दाखवली. “भाजपला आता कुबड्यांची गरज नसून, 2०२९ ला भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येईल” असं शाहांनी एक नव्हे तर अनेक वेळा सांगितलं आहे. त्यादृष्टीनं 2०२९ साठी शत प्रतिशत भाजपचा नारा देत, पावलं देखील टाकायला सुरुवात केली.
1. मंत्री शंभूराज देसाई (शिंदेसेना)- सत्याजित पाटणकर (काँग्रेस)
2. मंत्रइ संजय शिरसाट(शिंदेसेना) – राजू शिंदे (ठाकरेसेना)
3. विजयबापू शिवतारे(शिंदेसेना)- संजय जगताप (काँग्रेस)
4. अर्जुन खोतकर(शिंदेसेना)- कैलास गोरंट्याल (काँग्रस)
5. किशोर पाटील (शिंदेसेना)- वैशाली सूर्यवंशी (ठाकरेसेना)
6. सुहास बाबर (शिंदेसेना)- वैभव पाटील (राष्ट्रवादी (शप)
1. मंत्री दादा भुसे (शिंदेसेना) – अद्वय हिरे (ठाकरेसेना)
शिंदेंच्या या मंत्री आणि आमदारांच्या विरोधात विधानसभा लढलेल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्याकडे घेऊन भाजपनं चांगलीच फिल्डींग लावली आहे. आता ही भाजपची स्वबळाच्या दिशेनं असलेली वाटचाल तर जगजाहीर आहे. पण भाजप एवढ्या लवकर शिंदेंना सोडेल असं सध्यातरी वाटत नाही. याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिका.
मुंबई महानगरपालिका आणि भाजपला असलेली शिंदेंची गरज
मुंबईत भाजपचे १6 आमदार आहे. त्यापाठोपाठ ठाकरेंच्या सेनेचे १0 शिंदेसेनेचे ५ काँग्रेस 3राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीचे प्रत्येकी १ आमदार आहेत. तर यातील १2 मतदारसंघांमध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची सेना यांच्यातच प्रत्यक्ष लढत झाल्याचं विधानसभा निवडणुकांमध्ये पहायला मिळालं.
बोरिवली, दहिसर, मागाठाणे, गोरेगाव, विलेपार्ले, घाटकोपर पश्चिम, वडाळा आणि मलबार हील हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असले तरी या मतदारसंघामध्ये ठाकरेसेनेच्या उमेदवारांनी विधानसभेला दुसऱ्या क्रमांकांची मत घेतली होती. तसंच विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलिना, माहिम आणि वरळी मतदारसंघात ठाकरेंचे जरी आमदार असले, तरी या मतदारसंघात शिंदे आणि भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तर भांडुप पश्चिम, अंधेरी पूर्व, चेंबूर आणि कुर्ला मतदारसंघात शिंदेंच्या आमदारांपाठोपाठ ठाकरेंच्या आमदारांनी दुसऱ्या क्रमांकावर मतं घेतली होती.
आता विधानसभेची आकडेवारी बघता ही लढत मुख्यतः भाजप आणि उद्धव ठाकरेंची सेना यांच्यात असली तरी शिंदेंची सेना आणि राज ठाकरेंची मनसे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार आहे हे मात्र निश्चित. आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची स्पष्ट चिन्ह असताना भाजपला कितीही कुबड्या दूर करायच्या असल्या, तरी पालिका निवडणुकीत शिंदेंची गरज लागणार हे निश्चित. यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, शिंदेंकडे असलेला ‘धनुष्यबाण’.
मुंबईमध्ये आजही धनुष्यबाण या चिन्हाला मानणारा मोठा वर्ग आहे. ज्याचा धनुष्याबाण त्याच्याकडेच बाळासाहेबांचा वैचारिक वारसा हा समज असणारा वर्ग भाजपला आपल्यासोबत हवा आहे. येत्या 22 जानेवारीला धनुष्यबाण कोणाचा याचा अंतिम निर्णय होणार आहे. यातल्या तीन शक्यता पडताळून पाहिल्यास एक तर परिस्थिती जैसे थे राहू शकते, म्हणजे बाण शिंदेकडेच राहणार. दुसरी शक्यता धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना दिला जाऊ शकतो. तिसरी आणि शेवटची शक्यता म्हणजे, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचे निर्देश न्यायालय निवडणूक आयोगाला देऊ शकतं. समजा यातली दुसरी किंवा तिसरी शक्यता खरी ठरल्यास भाजपचा शिंदेसेनेमध्ये असलेला रस कमी व्हायला फार वेळ लागणार नाही.
भाजपला शिंदेंची गरज असण्याचं दुसरं कारण म्हणजे, मराठी आणि हिंदी मतदारांमध्ये समतोल ठेवण्यासाठीच. भाजपनं अजूनही भाजपची सत्ता आल्यास महापौर मराठीच होईल असं स्पष्ट सांगितलेलं नाही. भाजप ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावरच लढणार. हे निश्चित झालं असताना इथे शिंदे भाजपसाठी हिंदुत्व आणि मराठी दोन्ही आघाड्यांवर उजवे ठरताना दिसतात.
मिलिंद देवरा, अभिनेता गोविंदा, संजय निरुपम आणि शायना एनसीसह अनेकांना पक्षात महत्वाचं स्थान देत शिंदेंनी हिंदी कनेक्ट ठेवलाच आहे. तर मराठी आमची आई आणि हिंदी आमची मावशी असल्याचं म्हणत प्रताप सरनाईकांसारख्यांनी उत्तर भारतीय व्होट बँक फक्त भाजपचीच नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे जर ठाकरे बंधूंना मुंबईत आव्हान द्यायचं असेल तर भाजपला शिंदेंसेनेच्या कुबड्या लागणारच.
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपकेडे नसलेला मराठा चेहरा, शिवसेना नेते आणि फक्त ठाण्यापुरतं मर्यादित असलेलं नेतृत्व ही आपली ओळख शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्णतः पुसली आहे. जरांगेंचं उपोषण मोडित काढणं असो किंवा त्यांना मुंबईत येण्यापासून रोखणं, शिंदेंनी मराठा म्हणू स्वतःला वेळोवेळी प्रोजेक्ट केलंय.
दुसरीकडे भाजपनं शिंदेंना पर्याय म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं होतं. मात्र अजितदादांना सर्वसमावेशक राजकारण करताना शरद पवारांसारखं मराठा व्होट बँक आपल्यासोबत ठेवणं जमलं नाही. त्यामुळे हे सगळे मुद्दे आणि शिंदेंच्या पाठी असलेला दिल्लीश्वराचा आशीर्वाद बघता सध्यातरी महाराष्ट्र भाजपला शिंदेंशी जुळवून घ्याव लागेल असंच दिसतंय.
Comments are closed.