भाईने बोला, मारने का तो मारने का! रोहितचे हातवारे अन् विराटचा निर्णय, नेमकं काय घडलं?, VIDEO

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आयएनडी वि पीएके विराट कोहली-रोहिट शर्मा: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत (Champions Trophy 2025) काल (23 फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताने या विजयासह चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने शतक झळकावले. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 51 वे शतक ठोकले.

रोहित शर्माचे हातवारे आणि विराट कोहलीचा खणखणीत चौकार-

भारत विजयाच्या दारावर पोहचला असताना विराट कोहली देखील आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. भारताला विजयासाठी 2 धावा आवश्यक असताना विराट कोहलीला शतक पूर्ण होण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती. भारतीय चाहत्यांना विराट कोहलीचे शतक व्हावं, अशी इच्छा होती. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला देखील विराट कोहलीने आपले शतक पूर्ण करावे, असं वाटत होते. संघाला विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असताना कोहली 96 धावांवर खेळत होता. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या रोहित शर्माने विराट कोहलीला षटकार किंवा चौकार मारुन शतक पूर्ण कर, असं हातवारे करुन सांगितले. यानंतर विराट कोहलीने खणखणीत चौकार खेचत शतक पूर्ण केले आणि भारताला विजयही मिळवून दिला. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा एकतर्फी विजय-

भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. भारताकडून विराट कोहली 100 धावांवर नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने 56, शुभमन गिलने 46 धावा केल्या. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तान संघाला फक्त 241 धावा करता आल्या. यानंतर भारतीय संघाने 42.3 षटकांत सहज विजय मिळवला.

पाकिस्तानकडून शकील अर्धशतक-

प्रथम फलंदाजी करताना बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हार्दिक पांड्याने मोडली. त्याने बाबरला तंबुत पाठवले. त्याला 26 चेंडूत पाच चौकारांसह फक्त 23 धावा करता आल्या. पुढच्याच षटकात इमाम उल हकही धावबाद झाला. त्याला 26 चेंडूत फक्त 10 धावा करता आल्या. 47 धावांत दोन विकेट गमावल्यानंतर सौद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तान डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. दरम्यान, शकीलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी अक्षर पटेलने मोडली. त्याने रिझवानला क्लीन बोल्ड केले. 77 चेंडूत तीन चौकारांसह 46 धावा काढल्यानंतर तो बाद झाला.

संबंधित बातमी:

Ind vs Pak : भारत जिंकला, विराटही बरसला; ‘देव मोठा की तुम्ही’ असं म्हणणारा कुंभमेळ्यातील IIT बाबा तोंडावर आपटला

https://www.youtube.com/watch?v=zrrgc84friw

अधिक पाहा..

Comments are closed.