चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पुराचे सावट

उजनी व वीर धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्याने पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जुना दगडी पूल आणि पात्रातील मंदिरे पाण्यात बुडाली असून आषाढीच्या तोंडावर पुराचे संकट ओढवल्याने प्रशासन आणि भाविकांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान वारी पूर्वी चंद्रभागा पूर्ववत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी दिला आहे.

उजनी आणि वीर मधून सुमारे साठ हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीत असल्याने, जुना दगडीपूल पाण्याखाली गेला आहे. तर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जावू लागले आहेत. यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पाण्याने चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. आषाढी यात्रा काळात पूरपरिस्थिती निर्माण नये म्हणून प्रशासनाने आषाढीपुर्वीच चंद्रभागेच्या पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

वीर धरण व उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीर धरणातून नीरा नदीत तर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वीर धरणातून नीरा नदीपात्रात दि. 24 जून रोजी सायंकाळी 22360 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. तर उजनी धरणातून दि. 24 रोजी सकाळी दहा वाजता 41600 क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे हा पाण्याचा विसर्ग रात्री पंढरपूर येथे 63 हजार 960 इतका असणार आहे. परंतू, मंगळवारी सायंकाळी पंढरपूर येथे 40 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. या पाण्याने चंद्रभागा नदीवरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे,तर वाळवंटातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. छोटी मंदिर पाण्यात बुडाली आहेत. तर पुंडलिक व इतर मोठी व उंच मंदिर पाण्यात अर्धी बुडाली आहेत. पाणी महाव्दार, विप्रदत्त घाटाला लागले आहे. यामुळे सद्या तरी चंद्रभागा नदीपात्रात पाय ठेवायला जागा नसल्याने भाविक घाटाच्या पायर्‍यांवर थांबून स्नान करत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, गुरसाळे, इसबावी, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, खरसोळी, पुळूज हे कोल्हापूर पध्दीते बंधारे पाण्याखाली जावू लागले आहेत. यामुळे या बंधार्‍यांवरील वाहतूक बंद करण्यांत आलेली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आपतकालीन व्यवस्था

चंद्रभागा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आषाढी यात्रेला येण्यासाठी पालख्या दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. त्यामुळे पंढरपूरात चंद्रभागा स्नानासाठी व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गर्दीही वाढत आहे. याचा विचार करुन स्नानासाठी येणार्‍या भाविकांना नदीपात्रात सुरक्षा पुरवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टिम स्पीड बोटीसह तैनात करण्यात आलेली आहे. जीवरक्षक दल नदी किनारी थांबून सेवा पूरवत आहेत.

Comments are closed.