भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी


छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात काही केअरटेकर आणि शिपाई यांनी मतिमंद विद्यार्थ्यांवर बेदम मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. कुकरच्या झाकणांनी, लाथा-बुक्क्यांनी या निरागस लेकरांना केल्याचा प्रकार प्रकाशात आला असून, या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. (Crime news) विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

देवाने निरागसता दिलेली, पण नियतीने दु:ख दिलेली ही लेकरं ज्यांना आपली वेदना शब्दांत सांगता येत नाही, अशा विद्यार्थ्यांवर माणुसकी हरवलेल्या केअरटेकरांनी अत्याचार केले. ‘एबीपी माझा’च्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दृश्य स्पष्ट दिसत आहे. विद्यार्थ्यांना आधार देणारे हातच जर त्यांना तुडवत असतील, तर समाज म्हणून आपण कुठे जात आहोत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: कोण आहेत आरोपी?

या अमानवी वागणुकीत दोन कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे. दीपक इंगळे हा गेल्या 10 वर्षांपासून या विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने एका विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. तर, प्रदीप देहाडे हा देखील दहा वर्षांपासून या संस्थेत काळजीवाहक म्हणून काम करत होता. विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आणि प्रशासनाची कारवाई

या घटनेनंतर शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितले की, या दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. संस्थेतील इतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे.

हा प्रकार घडला तो राज्यातील सामाजिक न्याय खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यात. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सावे म्हणाले, “ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही, अशा मुलांचा सांभाळ करण्यासाठी सरकारने संस्था उभ्या केल्या. जर या संस्थाच छळछावण्या बनत असतील, तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. गतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी आहे. त्यांच्या अश्रूंवर सरकार, समाज आणि आपली मने जागी झाली पाहिजेत …नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण बंद होईल… कायमचं!” या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संस्थेवरील देखरेख आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.