Chitra Wagh advises railway passengers to take care of their lives


लोकलने प्रवास करताना सर्वांनी एक लक्षात घ्यावे की, आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच; पण, त्याचवेळी आपल्या घरात आई, वडील आणि बायको, मुले हे देखील फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत. ते तुमची वाट पाहत असतात.

(Mumbra accident) मुंबई : मुंब्रा येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात पाच रेल्वेप्रवाशांचा मृत्यू झाला. अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधील 8 प्रवासी दिवा आणि मुंब्रा स्थानकाजवळ एकमेकांना घासून खाली पडले. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर प्रवास करत होते. राजकीय स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मृत्यूचे खापर प्रवाशांवर फोडू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. तर, प्रवाशांनीही आपल्या जीवाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी दिला आहे. (Mumbra accident: Chitra Wagh advises railway passengers to take care of their lives)

भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘मुंबईतील लोकल दुर्घटना क्लेशदायक’ या शीर्षकाने पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात, मुंब्रा स्टेशनजवळ घडलेली लोकल दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करणारे हे दुर्दैवी जीव होते आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी पाच-सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई हे अतिशय गजबजलेले शहर आहेच. पण, प्रवाशांनी सुद्धा आपल्या जीवाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकलने प्रवास करताना सर्वांनी एक लक्षात घ्यावे की, आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच; पण, त्याचवेळी आपल्या घरात आई, वडील आणि बायको, मुले हे देखील फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत. ते तुमची वाट पाहत असतात. हे जे प्रवासी मृत्युमुखी पडले, त्यांचे कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वोसर्वा यांनी रेल्वेकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचे उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची ठरलेल्या वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.



Source link

Comments are closed.