Conduct structural audit of bridges, culverts, public works minister shivendrasinhraje bhosale instructs in marathi
पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत 25 वर्षांपेक्षा जुने पूल, साकव तसेच इमारतींचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंगळवारी दिल्या.
Bridge Collapse : मुंबई : पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत 25 वर्षांपेक्षा जुने पूल, साकव तसेच इमारतींचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंगळवारी दिल्या. तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. वारी महामार्ग सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही भोसले यांनी विभागाला दिल्या. (conduct structural audit of bridges, culverts, public works minister shivendrasinhraje bhosale instructs)
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व पूल आणि साकवांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत भोसले म्हणाले, पूल आणि साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर एखादा पूल धोकादायक असेल तर त्याठिकाणी वाहतूक बंद करुन पर्यायी मार्ग तातडीन उपलब्ध करून द्यावा. तसेच त्या ठिकाणी नवीन पूल, साकव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. धोकादायक पुलाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हवलता न येणारे बॅरिकेड्स लावावेत. स्थानिक पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यांना धोकादायक पुलाविषयी माहिती कळवावी. पर्यायी रस्ता सुस्थितीत असेल याची काळजी घ्यावी. धोकादायक पुलावर ठळक अक्षरातील फलक लावण्यात यावेत. महामार्गावरील वापरात नसलेल्या पूलांच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून ते बंद करावेत. सार्वजनिक इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
राज्यातील सर्व रस्ते खड्डे मुक्त राहतील याची काळजी घ्यावी. तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः गणपतीच्या काळात या मार्गावरून चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणपतीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम पूर्ण करावे. विना अडथळा वाहतूक सुरू राहील याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. परशुराम घाटात पर्यायी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. नियमाप्रमाणे सर्व वळण रस्ते तयार करावेत. वळण रस्ते पूर्ण झाल्यानंतरच मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करावी. घाट रस्त्यांवर जाळी बसवणे, ते सुस्थितीत ठेवणे तसेच दरड कोसळल्यास किंवा इतर अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी अशा सूचनाही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या आहेत.
वारी महामार्गावर वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा उभाराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने वारी मार्गाची सर्व कामे करण्यात यावीत. वारीसाठी मार्ग पूर्ण सुरक्षित राहील याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. रस्त्यावरील खड्ड्यांविषयी विभागाने सुरू केलेल्या ऍपचा प्रभावी वापर करावा, अशा सूचनाही भोसले यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
Comments are closed.