Congress Nana Patole on eci directed to destroy election videos and photos within 45 days
नागपूर : नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल केला. या निर्णयानुसार आता एक वर्षाऐवजी केवळ 45 दिवसांपर्यंत हे फुटेज आणि फोटो संग्रहित ठेवले जाणार आहेत. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा कालावधी लागू होईल आणि या काळात कोणतीही निवडणुकीशी संबंधित याचिका दाखल केली नाही तर डेटा नष्ट केला जाऊ शकतो. पण आता यावरून विरोधक आक्रमक झाले असून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Congress Nana Patole on eci directed to destroy election videos and photos within 45 days)
हेही वाचा : ECI : निवडणुकीचे व्हिडीओसह फोटो 45 दिवसांत नष्ट करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजप-युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती आणि दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता. पण आपली चोरी पकडली जाणार या भीतीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या 48 तासात नियम 93 बदलला आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “संध्याकाळी 58 टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी 65 टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ 8 टक्क्यांची असून ते जवळपास 76 लाख मतदान आहे. हे 76 लाख मतदान कसे वाढले? यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी 5 नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली. पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला.” असे म्हणून त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले की, “उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभरामध्येच 17 डिसेंबर 2024 ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम 93मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम 93 नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या.” असे आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
“19 डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 डिसेंबरला निवडणूक आयोग आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री 10.23 वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला.” असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले. “मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली? यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत,” असेही नाना पटोले म्हणाले.
Comments are closed.