बिहारमध्ये 5 जागांवर काँग्रेस-आरजेडी आमनेसामने आहेत

राजदकडून 143 उमेदवारांची यादी जाहीर : काँग्रेसने आघाडी मोडावी, पप्पू यादवांची मागणी

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाने सोमवारी 143 उमेदवारांची यादी जारी केली आहे. यातील 5 जागांवर राजदने काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात स्वत:चे उमेदवार उभे केल्याने महाआघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. तर एकूण 12 जगावर महाआघाडीतील घटक पक्षांनी परस्परांच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकनाकरता सोमवार हा अंतिम दिवस होता. तर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. अशास्थितीत महाआघाडीतील कलह किंवा मतभेद सर्वांसमोर आले.राजदने 143 उमेदवारांची यादी जारी करण्यापूर्वीच महाआघाडीतील तणाव उघडपणे समोर आला. राजद आघाडी धर्माचे पालन करत नसल्याचा आरोप करत पप्पू यादव यांनी काँग्रेसने ही आघाडी तोडावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसने रविवारी रात्री उशिरा उमेदवारांची चौथी यादी जारी केली होती. ज्यात 6 उमेदवारांची नावे सामील होती. पक्षाने आतापर्यंत 60 उमेदवारांची घोषणा केली आहे.पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. याचदरम्यान 24 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या गावी जात मोदी हे त्यांना श्रद्धांजली वाहतील, यानंतर समस्तीपूर आणि बेगूसराय येथे प्रचारसभांना मोदी संबोधित करतील.

राघोपूरमध्ये तेजस्वी यादव उमेदवार

महाआघाडीतील तणावादरम्यान राजदने 143 उमेदवारांची यादी जारी केली आहे. पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे तेजस्वी यादव हे वैशालीच्या राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तर महुआ येथे लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांच्या जागी मुकेश रोशन यांना राजदने उमेदवारी दिली आहे. याचबरोबर पक्षाने 24 महिलांना तिकीट दिले आहे. सामाजिक संतुलन आणि युवांच्या भागीदारीला विचारात घेत उमेदवारांची यादी तयार करण्यात आल्याचा दावा राजदने केला आहे.

एआयएमआयएमकडून यादी

एआयएमआयएमने  25 उमेदवारांची पहिली यादी जारी केली. या यादीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल ईमान यांना अमौर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. एआयएमआयएमने 2020 च्या बिहार निवडणुकीत 5 जागांवर विजय मिळविला होता.

महाआघाडीकडुन अनेक जागांवर वॉकओव्हर

बिहार निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. महाआघाडीतील घटक पक्षांना आतापर्यंत जागांची संख्या निश्चित करता आलेली नाही. वातानुकूलित कक्षांमध्ये बसून नेते आपण एकत्र आलो तसे कार्यकर्तेही एकत्र येतील, असे मानत आहेत, परंतु प्रत्यक्षात असे घडत नाही. बिहारमध्ये रालोआने यापूर्वीच आघाडी घेतली होती, परंतु आता महाआघाडीने अनेक जागांवर आमच्यासमोरील आव्हान सोपे केले आहे. अनेक जागांवर महाआघाडीने आम्हाला वॉकओव्हर दिला असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे.

Comments are closed.