सहकारी बँकांना शक्ती मिळणे शेतकऱ्यांच्या हिताचे, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

सहकारी बँकांची समृद्धी होणे गरजेचे असून राज्य किंवा जिल्हा बँकेने सहकारी बँकांना शक्ती देणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून पदभार स्वीकृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा सहकारी बँकेला पॉवरफुल्ल इंजिनची आवश्यकता होती. त्यादृष्टीने राज्य सहकारी बँकेने घेतलेली जबाबदारी स्वागतार्ह आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य सहकारी बँक उत्तम काम करत आहे. त्यांची उलाढाल तर वाढलीच आहे, शिवाय नफाही मोठ्या प्रमाणात कमावला आहे. साखर आणि इथेनॉल उद्योगाला देखील मोठे सहकार्य बँकेने केले आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून शेतकऱयांच्या कर्ज पुरवठ्याचे मार्ग खुले होतील.’ बँकेचे भविष्य बदलायला सुरुवात झाली आहे. त्याचा लाभ ग्रामीण जनतेला नक्की होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आशीष जयस्वाल, आमदार आशीष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.
बँकांवर शेतकऱ्यांची जबाबदारी – मुख्यमंत्री
जिल्हा सरकारी बँक चांगली असेल तर शेतकऱयांनाच फायदा होतो. आज जिह्यातील अनेक बँका शेतकऱयांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. जिल्हा आणि राज्य सहकारी बँकेवर शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सहकारातून समृद्धीच्या दिशेने प्रवास सुरू झाला असल्याचेही ते म्हणाले.
Comments are closed.