टी20 वर्ल्ड कपमध्ये सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पत्नी-गर्लफ्रेंड असणार की नाही? बीसीसीआयने दिले ‘हे’ उत्तर
२०२६ टी-२० वर्ल्ड कप दरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या एका वादग्रस्त धोरणावर ठाम राहत भारतीय खेळाडूंची मागणी फेटाळून लावली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बीसीसीआयकडे मागणी केली होती की, खेळाडूंना टी-२० वर्ल्ड कप २०२६ दरम्यान आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंची ही मागणी फेटाळली आहे.
’द इंडियन एक्सप्रेस’च्या एका रिपोर्टनुसार, टीम मॅनेजमेंटने यावर स्पष्टीकरण मागितले होते की, वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळाडू आपल्या पत्नी, मंगेतर (Fiancée) किंवा गर्लफ्रेंडला सोबत ठेवू शकतात का? मात्र, बीसीसीआयने ही मागणी थेट फेटाळून लावली आहे. दरम्यान, या संदर्भात बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे म्हणणे आहे की पत्नी किंवा मंगेतर खेळाडूंसोबत राहू शकत नाहीत, पण खेळाडूंना हवे असल्यास ते त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करू शकतात.
२०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून १-३ अशा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर बीसीसीआयने एक नवीन धोरण लागू केले, ज्यानुसार खेळाडूंच्या कुटुंबांना त्यांच्यासोबत फक्त १४ दिवस राहण्याची परवानगी असेल; तीही तेव्हाच जेव्हा टीम इंडियाचा परदेशी दौरा ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त असेल. टी-२० वर्ल्ड कप २०२६ ही अट पूर्ण करत नाही आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे आयोजन भारतातच होत आहे.
समाधानाची बाब म्हणजे भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील आपला पहिला सामना सहज जिंकला. भारताने अमेरिकेचा (USA) २९ धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाचा दुसरा सामना १२ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणार आहे. तसेच, पाकिस्तानने आपला बहिष्काराचा निर्णय मागे घेतल्यामुळे आता १५ फेब्रुवारीला होणारा भारत-पाकिस्तान सामना देखील निश्चित झाला आहे.
Comments are closed.