Devendra Fadnavis hits back at Rahul Gandhi allegations regarding Maharashtra Assembly Elections
महाराष्ट्रात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
गडचिरोली : लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये देशातील निवडणुकींसंदर्भात एक मोठा लेख लिहिला आहे. या लेखामुळे देशामध्ये खळबळ उडाली आहे. कारण या लेखात त्यांनी पाच टप्प्यांमध्ये निवडणुकीत करण्यात करण्यात आलेल्या घोटाळ्याचा लेखाजोखा मांडला आहे. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच, असे खासदार राहुल गांधी यांनी लेखामध्ये म्हटले आहे. पण त्यांच्या या आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis hits back at Rahul Gandhi allegations regarding Maharashtra Assembly Elections)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 7 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांनी निवडणुकीसंदर्भात केलेल्या आरोपांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा फडणवीसांनी पलटवार करत म्हटले की, रोज खोटे बोलले की लोकांना खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत असल्याने त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात. हा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले आहे. पण रोज खोटे बोलायचे ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
तसेच, जोपर्यंत राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत. जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. मला वाटते स्वतःशी खोटे बोलून स्वत:ला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे. त्यामुळे राहुल गांधींनी जे बोलतात ते ना ते त्यांना कळत, ना त्यांना ऐकणाऱ्यांना कळत. त्यामुळे त्याबाबत मी काय बोलू? असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीसांनी डागले आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेतेमंडळींकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.