‘राजीनामा देण्यासारखं मी केलं काय? विनयभंग केला की चोरी केली?’ वादग्रस्त विधानाने कोकाटेंचा पाय आणखी खोलात; अडचणी वाढल्या

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान करत वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे कोकाटेंचा पाय आणखी खोलात असल्याचे दिसत आहे.
पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे म्हणाले की, ‘राज्य सरकारने एक रुपयात पिकविमा ही योजना आणली होती. त्यावर मी म्हणालो होतो की, हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला. शेतकऱ्यांना आम्ही एक रुपया देत नाही. शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतो. म्हणजे भिकारी कोण? तर शासन भिकारी आहे. कोकाटेंच्या या विधानामुळे पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे. शासन भिकारी आहे शेतकरी नाही, असं म्हणून शेतकऱ्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न त्यांच्याच विधानामुळे चांगलाच फसला आहे.
‘माझ्या काळात पिकविमा योजनेत बोगस अर्ज सापडले. मी तात्काळ रद्द केले. मी 52 जीआर काढले. सर्वाधिक निर्णय घेतले’, असे म्हणत कामांची यादीवाचून आतापर्यंत असा कृषीमंत्री झाला नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला.
मी विनयभंग केला? की चोरी केली?
विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर ‘राजीनामा देण्यासारखं घडलं काय?’, असा प्रतिसवाल केला. कोकाटे म्हणाले की, ‘राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काही विनयभंग केला आहे? चोरी केली आहे? माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय? ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे’, असा धमकी वजा इशाराही देणारे विधानही त्यांनी केले.
विधानसभेतील त्या व्हायरल व्हिडीओवर पुढे बोलताना ते म्हणाले की,’मुख्यमंत्र्यांना मी ब्रिफ केलं नाही. त्यांना मी भेटलो नाही. त्यांनी मीडिया रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली आहे. मी 25 वर्ष विधानसभेत आहे. मला विधानसभेचे नियम माहीत आहेत. पण काही लोकांनी अनावश्यक विषय लावून धरला. अँड्राईड मोबाईल आहे. काही टच झालं तर भलतंच काही तरी दिसतं. स्किप करेपर्यंत माझा दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल’, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील कोकाटे यांनी यावेळी केला.
Comments are closed.