Devendra Fadnavis responded to Uddhav Thackeray criticism of Eknath Shinde
गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला होता. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला होता. ‘इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असा टोला ठाकरेंनी लगावला होता. याचबाबत आज शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांकडून विचारणा करण्यात आली. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर रोज बोलण्यासाठी वेळ नाही असे म्हणत प्रत्युत्तर दिले. पण, त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि आरसा पाहावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे. (Devendra Fadnavis responded to Uddhav Thackeray criticism of मराठी)
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे बऱ्याच गोष्टी बोलत असतात. रोज मी त्यांना उत्तरं द्यायला लागलो, तर एवढा वेळ माझ्याकडे नाही. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, समजा तेच जर खरे होते आणि हे जर (शिंदे गट) गद्दार होते तर, महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना मत दिले आहे का? असा सवाल देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीसांनी विचारला. हा तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला. महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिले आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केले, त्यांना तुम्ही गद्दार म्हणत आहात. मला वाटते उद्धव ठाकरेंनी आरसा बघितला पाहिजे, असे टोला लगावत मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा… CM Fadnavis on Yogesh Kadam : जरा सांभाळून बोला, फडणवीसांचा योगेश कदमांना अनुभवाचा सल्ला
तर, स्वतःला हिंदू रक्षक समजणारे महाकुंभाला गेले नाहीत,असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार, रोहित पवार यांसारखे नेते कुंभमेळ्यात स्नानासाठी गेले होते. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ज्याचा सतानतवर विश्वास आहे, ज्या व्यक्तीला हिंदू जीवनपद्धती ही प्रिय आहे, असे सगळे लोक कुंभमेळ्यात गेले. काही लोकं नाही गेले, त्यांची वेगळी कारणे असू शकतात. कोणी तिथे गेले नाही म्हणून त्यांचे सनातनवर प्रेम नाही, असे मी म्हणणार नाही. त्यांची, स्वत:ची काही कारणे असतील. जे (कुंभमेळ्यात) गेले त्यांचे प्रेम आहे, असे आपण समजूया, ते केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत, असेही आपण समजूया, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Comments are closed.