Dhananjay Munde should resign: Union Minister Ramdas Athawale
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नाही. खूनाच्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा जवळचा असल्याने नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. अजित पवारांनी याबाबत निर्णय घेऊन मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी २ मार्च १९३० रोजी आंदोलन सुरू केले होते. यंदा या ऐतिहासिक घटनेला ९४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि.२) काळाराम मंदिरातील पूर्व दरवाजा येथे स्तंभाला सहकुटुंब येत अभिवादन केले. (Dhananjay Munde should resign: Union Minister Ramdas Athawale)
यावेळी आठवलेंनी सहकुटुंब श्री काळारामाचे दर्शन घेतले. मंत्री आठवले पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सत्याग्रह केले होते त्यामध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा या मुख्य मागणीचा समावेश होता. काळाराम मंदिरात आमचाही प्रवेश असावा, आम्हीसुद्धा हिंदू आहोत, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती.
बाबासाहेबांना सर्वांना एकत्र आणायचे होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आम्ही बौद्ध आहोत. परंतु, हिंदू धर्म हा देशातील सर्वात मोठा धर्म आहे. संविधानाने सर्व धर्मांना समान अधिकार देऊन देशाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला, असेही मंत्री आठवले यांनी सांगितले.
Comments are closed.