चालकाला डुलकी लागली आणि घात झाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सातजण जखमी

समृद्धी महामार्गावर वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज पहाटे भीषण अपघात घडला. क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये हा अपघात घडला असून यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर सातजण जखमी झाले आहेत. अब्दुल शेख (६५) आणि जाहीद सिद्दिकी (४०) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये २ लहान मुले, ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. गंभीर जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला आहे.
समृद्धी महामार्गावर वाशिंद आणि आमनेदरम्यान एक कंटेनर मुंबईकडे जात होता. याचदरम्यान नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून भिवंडीकडे भरधाव निघालेल्या क्क्रुझर गाडीचा चालक मारुती गुंजाळ याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट पुढे चाललेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले तर चालकासह ६ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील शासकीय रुग्णवाहिका, शहापूरच्या महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी छाया कांबळे यांनी आपले कर्मचारी पाठवून अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून तत्काळ भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पहाटेच्या सुमारास कोसळणाऱ्या पावसात अतिवेगात असलेल्या क्रुझर गाडीचा वाहनचालक मारुती गुंजाळ याला डुलकी लागल्याने हा आपघात झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पंधरा दिवसांत 8 अपघात
समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे ५ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र हे काम घिसाडघाईत झाल्याने इगतपुरी ते आमने हा ७६ किमीचा मार्ग अपघाताचा स्पॉट झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर १५ दिवसांत ८ अपघात झाले. यात आतापर्यंत ३ जण मृत झाले आहेत तर ११ जण जखमी झाले आहेत.
Comments are closed.