इराण इस्रायल संघर्षामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता, केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळीवर होणारा परिणाम लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि पुढील काही महिन्यांसाठी ठोस धोरण आखावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील ‘एक्स’ या माध्यमावर पोस्ट करत ही भूमिका मांडली.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, मध्य पूर्वेतील युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षिततेबाबत, अन्न सुरक्षिततेबाबत आणि अर्थव्यवस्थेसमोर उभ्या राहू शकणाऱ्या अडचणींबाबत केंद्र सरकारने सर्वपक्षीय चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.
मध्य पूर्व भागात युद्ध लवकर संपावे आणि त्या प्रदेशात स्थिर शांतता प्रस्थापित व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली. मात्र, 1 अब्जांहून अधिक लोकसंख्या असलेला देश आणि प्रत्यक्षात पूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ नसलेली अर्थव्यवस्था असल्यामुळे केंद्र सरकारने पारदर्शकता दाखवावी आणि द्विपक्षीय सहमतीने दिशा ठरवावी, असेही त्यांनी नमूद केले.
या संदर्भात त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची आठवण काढत जागतिक मंदीच्या काळात त्यांनी हिंदुस्थानला सुरक्षित मार्गदर्शन केले होते, असेही म्हटले.
मध्यपूर्वेतील युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक पुरवठा साखळ्यांवर होणारा परिणाम पाहता, भारत सरकारने येत्या काही महिन्यांत भारताची ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि संभाव्य अडचणींबाबत क्रॉस-पार्टी बैठका आणि धोरण ठरवणे सुरू केले पाहिजे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) ३ मार्च २०२६
Comments are closed.