तिबेटमध्ये भूकंपाचा धक्का, पूरपरिस्थितीनंतर 5.0 तीव्रतेचा भूकंप
नेपाळ सीमेजवळील एका शहराला विनाशकारी पुराचा फटका बसल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच गुरुवारी तिबेटमध्ये 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.0 इतकी मोजली गेली आहे. सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राच्या (GFZ) माहितीनुसार, गुरुवारी तिबेटमध्ये 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला. GFZ ने दिलेल्या अहवालानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर (6.21 मैल) खोलीवर होता.
यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी तिबेटमधील हिमनदी कोसळल्यामुळे या भागात भीषण पूर आला होता. हिमनदी फुटल्याने आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने शहरे आणि खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणला. या आपत्तीमुळे नेपाळमध्ये आतापर्यंत किमान 1252 लोकांचा मृत्यू झाला असून 4200 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर दुसरीकडे, चीनने दिलेल्या माहितीनुसार तिबेटच्या बाजूला 21 जणांचा मृत्यू झाला असून 541 नागरिक बेपत्ता आहेत.
पूर आणि पायाभूत सुविधांच्या झालेल्या नुकसानीमुळे चीनच्या बाजूने बचाव आणि मदत कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. मात्र, आता चीनने नेपाळच्या ग्यिरोंग सीमा चौकीशी जोडणारा मुख्य रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. यामुळे आपत्तीग्रस्त भागात प्रथमच अवजड यंत्रसामग्री पोहोचवणे शक्य झाले आहे. पुरामुळे चीनचा G216 राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्याने प्रशासनाला उपकरणांच्या वाहतुकीसाठी हवाई मार्गाचा अवलंब करावा लागला होता, तर काही बचाव कर्मचाऱ्यांना पायी चालत दुर्गम भागात पोहोचावे लागले होते.
दरम्यान, प्रत्यक्ष मदतकार्यात प्रगती होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, असा इशारा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. हिमनदी फुटल्यामुळे तयार झालेल्या ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह अडकून तिबेटच्या बाजूला अनेक कृत्रिम तलाव निर्माण झाले आहेत. यातील काही तलावांमधील पाणी आपोआप ओसरू लागले असले तरी, पुन्हा भूस्खलन झाल्यास किंवा हिमनदी फुटल्यास नवीन अडथळे निर्माण होऊन अचानक पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.