इराणमधून आठ भारतीय खलाशी मायदेशी परतले

तीन महिन्यांच्या कैदेनंतर घरवापसी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्ध आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणमध्ये अटकेत असलेले उर्वरित आठ भारतीय खलाशी आता मायदेशी परतले आहेत. हे खलाशी संयुक्त अरब अमिरातीस्थित ‘एमटी व्हॅलियंट रोअर’ या टँकरवर असताना 8 डिसेंबर 2025 रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या तावडीत सापडले होते. इराणने या जहाजावर 6,000 टन इंधनाची तस्करी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या जहाजावरील सर्व क्रू मेंबर्सनाही अटक करून ठेवण्यात आले होते. कॅप्टन विजय कुमार यांच्यासह आठ भारतीय खलाशांची शेवटची तुकडी रविवार 22 मार्च रोजी इराणमधील बंदर अब्बास येथून रवाना झाली. त्यांना टॅक्सीने सुमारे 2,000 किलोमीटरचा प्रवास करून आर्मेनियाच्या सीमेवर पोहोचवण्यात आले.

त्यानंतर त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापूर्वी, 16 खलाशांपैकी पहिल्या आठ जणांची 11 फेब्रुवारी 2026 रोजी सुटका करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेत दिल्ली उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने महत्त्वाची भूमिका बजावली. अटकेच्या काळात खलाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काहींना बंदर अब्बास तुरुंगात, तर इतरांना जहाजावरच ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांशी दीर्घकाळ संपर्क तुटल्यामुळे त्यांच्यामध्ये चिंता निर्माण झाली होती. या संपूर्ण प्रकरणात भारत सरकारने सक्रिय भूमिका बजावली. परराष्ट्र मंत्रालय आणि बंदर अब्बास येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने खलाशांना दूतावासामार्फत भेटण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी आणि त्यांची सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Comments are closed.