पीएचच्या थेट डोक्यात आणि छातीत तब्बल 10 राऊंड फायरिंग; शुभेंदू अधिकारींची पहिली प्रतिक्रिया
चंद्रनाथ रथ मृत्यूवर सुवेंदू अधिकारी: पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे बुधवारी रात्री 10:30 वाजता भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ (42) (चंद्रनाथ रथ मृत्यू) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी चंद्रनाथ स्कॉर्पिओ गाडीतून कोलकाताहून मध्यमग्राममधील आपल्या घरी परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते चालक आणि आणखी एका व्यक्तीच्या शेजारी बसले होते. कोलकातापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोलतला आणि मध्यमग्रामच्या दरम्यान, मागून आलेल्या एका कारने स्कॉर्पिओचा मार्ग अडवला.
सहा ते दहा गोळ्या झाडल्या
हल्लेखोर मोटारसायकलवरून आला आणि त्याने स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूने सहा ते दहा गोळ्या झाडल्या. चंद्रनाथ यांना चार गोळ्या लागल्या, त्यापैकी दोन त्यांच्या छातीत आणि एक पोटात घुसली. चालक बुद्धदेव बेरा यांनाही गोळी लागली. घटनेनंतर हल्लेखोरांनी गाडी सोडून दुचाकीवरून पळ काढला. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी चंद्रनाथ यांना मृत घोषित केले. चालकाची प्रकृती गंभीर आहे. भाजपने तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) या घटनेमागे कट रचल्याचा आरोप केला आहे.
2-3 दिवसांच्या रेकीनंतर हत्या झाली
दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या पीएची हत्या ही एक पूर्वनियोजित हत्या असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, भाजप बंगालला गुंडांपासून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करेल.
गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न
हत्या प्रकरणात बंगाल पोलीस घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. यासाठी व्यावसायिक शूटर किंवा सुपारी किलर वापरले गेले होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चंद्रनाथ रथ यांच्या गाडीला अडवणारी संशयास्पद गाडी जप्त करण्यात आली आहे. मात्र, गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यामागील हेतू सध्या अस्पष्ट आहे.
पीएच्या आईचा आक्रोश
शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ यांच्या आई हसिरानी रथ यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील चंदीपूर येथे माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “आरोपीला फाशी देऊ नये, तर जन्मठेपेची शिक्षा द्यावी.” हसिरानी रथ यांनी आरोप केला की, भाजप सत्तेवर आल्यानंतर मुलाला लक्ष्य करण्यात आले. त्या म्हणाल्या, “टीएमसी नेत्यांनी निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक वक्तव्ये केली आणि त्याचे परिणाम 4 मे नंतर जाणवले.” त्या म्हणाल्या, “जर माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला असता, तर मला इतके दुःख झाले नसते, पण ज्या प्रकारे त्याचा छळ करून खून करण्यात आला, ते अत्यंत वेदनादायी आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.