धाराशिवमध्ये पूरस्थिती, खासदार ओमराजे निंबाळकरांनी आजी आणि नातवाची केली सुटका

परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलाच दणका दिला असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिवमध्येही जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वडनेरमध्ये पुरात आजी आणि त्यांचा दोन वर्षांचा नातू गेल्या दोन दिवसांपाासून अडकले होते. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर यांना माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेत NDRF च्या जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुटका केली.

वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व त्यांचा २ वर्षाचा नातू आणि २ जण दोन दिवसांपासून पाण्याने वेढले गेले होते. ते स्वतःच्या घरात अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते. याची माहिती मिळताच ओमराजे यांनी NDRF च्या जवांनाच्या मदतीने बचाव कार्यात सहभागी होत कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढले. या कामात सोमवारी संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले, असे त्यांनी सांगितले. या कार्यात NDRF च्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील मेहनत घेत बचावकार्य यशस्वी केले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभआर मानले असून त्यांचे अभिनंदन केलं आहे.

जिल्ह्यात ओमराजे पुढाकार घेत पूरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. लाखी तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे अडकलेल्या १३ महिला,२ लहान मुले व १२ पुरुषांना काढण्यास व सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यास यश आले आहे. आणखी जर काही ठिकाणी असे नागरिक अडकले असतील तर तात्काळ संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पहाटे 3 वाजता या पिंगळे कुटुंबातील मुलीने व आमचे जिल्हा प्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील व मेघराज पाटील यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर मी प्रथम जिल्हाधिकारी धाराशिव कीर्ती किरण पुजार यांच्याशी 4 च्या आसपास चर्चा केल्यानंतर तात्काळ नाशिकचे सिंग 201 Army Aviation Squadron कर्नल अक्षय कुमार सिंग त्यांच्याशी बोलून यांच्याशी चर्चा केली व आर्मीच्या हेलिकॉप्टर पाठहून देऊन हेलिकॉप्टर द्वारे सदरील नागरिकांना बाहेर काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर सतत च्या प्रयत्नानंतर 12 वाजता आर्मी हेलिकॉप्टरचे कमांडिंग ऑफिसर पायलट लेफ्टिनेंट कर्नल करण बरार व मेजर देवांश यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा कठीण प्रसंगी नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले.

तडवळे ता बार्शी येथे अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांची माजी मंत्री तथा आमदार दिलीप सोपल यांच्यासोबत ओमराजे यांनी पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ आहेत. त्यांच्या घामाने सिंचन झालेल्या मातीतूनच महाराष्ट्राची भाकरी तयार होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने तात्काळ उभे राहून मदतीचे हात पुढे करणे ही काळाची गरज आहे, असे ओमराजे यांनी म्हटले आहे.

Comments are closed.