पूर, विजेचा लपंडाव, महामार्गाची दुर्दशा; नागरी समस्यांविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

दरवर्षी बसणाऱ्या पुराच्या तडाख्यातून नागोठणेकरांची सुटका व्हावी यासाठी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तीस वर्षांनंतरही हा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. त्यातच पावसाच्या नावाखाली शहर आणि परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेकडेही प्रशासन कानाडोळा करीत आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागरी समस्यांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयातील ग्रामपंचायत कार्यालयात कै. शैलेंद्र देशपांडे सभागृहात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. शहरात सतत येणारा पूर, वारंवार जाणारी लाईट व मुंबई-गोवा महामार्गाचे नागोठण्यात लटकलेले काम यावरून त्यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले. नागोठणे आयटीआय ते रिलायन्सकडे जाणाऱ्या ब्रीजपर्यंत संरक्षण भिंत बांधण्याचा खर्च कोट्यवधी रुपयांचा असताना अंदाजपत्रक एक कोटीचा बनवला आहे. सदर भिंतीबाबत योग्य इस्टिमेंट तयार करून नदीची खोली वाढविणे व पूर येऊ नये यासाठी तत्काळ तरतूद करावी अशी मागणीही किशोर जैन यांनी केली.
सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी पंचायत समिती सदस्य संजय भोसले, मजीत लांबते, ज्ञानेश्वर साळुंखे, अॅड. प्रकाश कांबळे, सचिन ठोंबरे, शबाना मुल्ला, दिलनवाज अधिकारी, भाविका गिजे, अमृता महाडिक, पूनम काळे, मोहन नागोठणेकर, धनंजय जगताप, संजय काकडे, भरत गिजे, अनिल महाडिक, जितेंद्र जाधव, सतीश पाटील, जोयब कुरेशी उपस्थित होते.
Comments are closed.