राजकोट किल्ला बंद ठेवण्याची शासनावर नामुष्की, माजी आमदार वैभव नाईक यांची टीका

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यात आला आहे. कोट्यावधी रुपये खर्चून सुद्धा काही दिवसांपूर्वी पुतळ्यालगतचा भाग खचल्याचे दिसून आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने बांधकाम विभागला स्वतःच्याच कामावर विश्वास नसल्याचे दिसून येते. पुतळ्या लगतचा परिसर खचण्याच्या भीतीपोटी राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची नामुष्की शासनावर ओढवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक उपाययोजना राबवण्याबरोबरच निकृष्ट दर्जाच्या कामात कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
राजकोट किल्ला येथे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा आठ महिन्यातच कोसळला. त्यानंतर पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यात आला आहे. या कामासाठी आतापर्यंत सुमारे 100 कोटी हून अधिक रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. असे असताना काही दिवसापूर्वीच पुतळ्या लगतची जमीन खचल्याची घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आपल्याच विभागावर विश्वास नसल्याचे किल्ला पर्यटकांसाठी बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर दिसून येत आहे. शिवपुतळा हा समुद्रापासून लांब आहे. समुद्राच्या पाण्याचा या पुतळ्याला कोणताही धोका नाही असे असतानाही मागील वेळेस जसे स्मारक कोसळले तसा पुतळ्या लगतचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न शिवप्रेमींना पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले वर्षानुवर्षे टिकत आहेत. अशा परिस्थितीत राजकोट किल्ला येथे साकारण्यात आलेला नवीन शिवपुतळा हा 100 वर्षे टिकेल असे नेतेमंडळी सांगत आहेत. असे असताना किल्ल्यालगतचा भाग कोसळेल की काय या भीतीपोटी पर्यटकांना बंदी घातली का असा प्रश्न पडला आहे, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवीत पुतळ्याच्या संरक्षणाबरोबरच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच निकृष्ट दर्जाच्या कामात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी आपली मागणी असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.