‘बाल आशीर्वाद योजना’ नावाने होतेय फसवणूक; अशी कोणतीही योजना नसल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाने योजना असल्याचे समाजमाध्यमावर पसरवून फसवणुक होत आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष वेधत फसवणूकीपासून सावध रहाण्याचा सल्ला दिला आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून, हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.
‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशी योजना असल्याचे भासवून समाजमाध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असा मजकूर प्रसारित करण्यात येत आहे. ही केवळ अफवा असल्याचे श्रीकांत हावळे यांनी सांगितले आहे.
Comments are closed.